संवेदनेतून जागवा माणुसकीची ‘मशाल’
By Admin | Updated: August 11, 2015 01:25 IST2015-08-11T01:25:16+5:302015-08-11T01:25:16+5:30
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न आहे. यावर राजकारण करणे, टीका करणे हे काम विरोधी पक्षांनी करावे. परंतु एक माणूस म्हणून जगताना हालअपेष्टेत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या

संवेदनेतून जागवा माणुसकीची ‘मशाल’
नागपूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा ज्वलंत प्रश्न आहे. यावर राजकारण करणे, टीका करणे हे काम विरोधी पक्षांनी करावे. परंतु एक माणूस म्हणून जगताना हालअपेष्टेत दिवस काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार देणे जास्त महत्त्वाचे आहे. हे सर्वच आपल्या सामाजिक कुटुंबाचा भाग आहे व त्यांना स्थैर्य देण्यासाठी संवेदनेतून माणुसकीची ‘मशाल’ जागवलीच पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
जनमंचतर्फे डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी ‘एका साध्या सत्यासाठी...’ या आर्थिक सहायता कृतज्ञता उपक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी भावुक झालेल्या नाना यांच्या आवाहनाने संपूर्ण सभागृहदेखील हळवे झाले. संवेदनशील मनाचे कलाकार नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी समोर येत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देऊन मदतीचा हात दिला आहे.
मुळात आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी असे कार्यक्रम करावे लागतात, यासारखे हे अतिशय दुर्दैवी आहे. शासनकर्त्यांच्या उणिवा आहेत. परंतु त्यांनी मदतदेखील केली आहे. शासनासोबतच आपल्या सर्वांचीदेखील अन्नदात्याप्रति जबाबदारी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी जनचळवळ उभी रहायला हवी. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी आधार बनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नाना पाटेकर यांनी केले.
शेतकऱ्यांबाबत समाजात असलेली मानसिकता बदलली गेली नाही तर ती अराजकतेची नांदी ठरेल. देशभर जसा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात येतो, त्याप्रमाणे शेतकरी दिवस साजरा व्हायला हवा, असे आवाहन मकरंद अनासपुरे यांनी केले.