‘घाऱ्या’,‘पोटल्या’मुळे खळबळ
By Admin | Updated: February 16, 2016 03:41 IST2016-02-16T03:41:19+5:302016-02-16T03:41:19+5:30
येथील आत्महत्या केलेले बिल्डर सूरज परमार आणि त्यांचे स्नेही वल्लभ मजेठिया यांच्यातील संवादात ‘घाऱ्या’ (राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड) आणि ‘पोटल्या’ यांचाही त्रास देणारे म्हणून उल्लेख केला गेला

‘घाऱ्या’,‘पोटल्या’मुळे खळबळ
ठाणे : येथील आत्महत्या केलेले बिल्डर सूरज परमार आणि त्यांचे स्नेही वल्लभ मजेठिया यांच्यातील संवादात ‘घाऱ्या’ (राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड) आणि ‘पोटल्या’ यांचाही त्रास देणारे म्हणून उल्लेख केला गेला होता, असा सनसनाटी दावा विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सोमवारी न्यायालयात केला.
परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या जामिनास विरोध करताना, ठाकरे यांनी मजेठिया यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत ‘घाऱ्या’ आणि ‘पोटल्या’ यांचा उल्लेख असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर ‘घाऱ्या’ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व ‘पोटल्या’ म्हणजे शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के असे स्वत: मजेठिया यांनीच जबानी देताना स्पष्ट केले होते, असेही ठाकरे यांनी नमूद केले. त्यामुळे या आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या चार नगरसेवकांबरोबर या दोन बड्या नेत्यांच्या नावांचा जाहीर उल्लेख झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मजेठिया यांच्या जबानीचा संदर्भ देत, अॅड. ठाकरे यांनी सांगितले की, ‘सूरज परमार हे एकदा मारुतीच्या मंदिरातून बाहेर आले. त्या वेळी मित्र वल्लभ मजेठिया त्यांना भेटले. त्या वेळी मुल्ला, जगदाळे, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण यांच्यासह ‘घाऱ्या’ आणि ‘पोटल्या’ त्रास देत होते,’असे त्यांनी मजेठियांना सांगितले. तेव्हा ‘घाऱ्या’ कोण? आव्हाड का? असा सवाल मजेठिया यांनी करताच, परमार यांनी होकारार्थी उत्तर दिले, तर ‘पोटल्या’ कोण? म्हस्के का? असे विचारले असता होकार भरला होता.
ठाणे महापालिकेचे वास्तुविशारद प्रवीण जाधव हे नगरसेवक आणि परमार यांच्यात मध्यस्थाची भूमिका वठवत होते, अशी धक्कादायक माहितीही ठाकरे यांनी न्यायालयात दिली, तसेच अॅड. ठाकरे यांनी नगरसेवक रवींद्र फाटक यांच्यासह काही महत्त्वपूर्ण साक्षीदारांची माहितीही सादर केली.
कॉसमॉसच्या प्रकल्पामधील बांधकामाला भोगवटा प्रमाणपत्र देण्यास स्थानिक राजकारण्यांनी विरोध केल्याचे करुणा खंबायत यांनी सांगितले, ही बाब सोमवारी न्यायालयात उघड झाली. भोगवटा प्रमाणपत्र नसल्यामुळे ज्या ग्राहकांनी पैसे गुंतविले, ते सदनिका मिळण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळे परमार हे कमालीचे तणावाखाली होते, असे परमार यांचा मुलगा अभिषेक यानेही पोलिसांना सांगितल्याचे उघड झाले आहे.
सूरज यांच्या बहिणीने आपल्या जबानीत २८ फेब्रुवारी २०१५ रोजी अंधेरी ते ठाणे सूरज यांच्याबरोबर मोटारीतून येताना त्यांनी कॉसमॉसच्या प्रकल्पांना राजकीय नेते कसे त्रास देत आहेत, याची कैफियत मांडली होती. यापुढे त्यांना एक छदामही देणार नसल्याचे सूरज आपल्याला बोलल्याचे बहिणीने पोलिसांना सांगितले होते. (प्रतिनिधी)ठाणे: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गेले ७० दिवस अगोदर पोलीस व आता न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना येथील सत्र न्यायालयाने सोमवारी सशर्त जामीन मंजूर केल्याने, त्यांच्यासह इतर तीन नगरसेवकांच्या जामिनाचा मार्गही सुकर झाल्याचे मानले जाते.
ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बंबार्डे यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी मुल्ला यांना जामीन देण्यास जोरदार विरोध केला. मात्र, आरोपीचा गुन्हा जन्मठेप अथवा मृत्युदंंड दिला जाऊ शकेल, एवढा गंभीर नाही, असे नमूद करत, १ लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुल्ला यांची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यांच्यासह हणमंत जगदाळे, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण या चारही नगरसेवकांना जामीन दिल्यास साक्षीदार, तसेच पालिकेतील अधिकाऱ्यांवर दबाव येऊन तपासात अडथळा येऊ शकतो, असा दावा ठाकरे यांनी केला. आरोपींना अनिश्चित काळासाठी जामीन देऊ नये, असे आपले मत नाही. मात्र, पोलीस विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास करणारअसल्याने जामिनाचा निर्णय लांबणीवर टाकावा, अशी मागणी केली. अखेर न्यायालयाने मुल्लांना जामीन मंजूर केला. तिघांच्या जामिनावरही येत्या काही दिवसांत सुनावणी व्हायची आहे.