‘घरवापसी’ने शत्रूंच्या संख्येत घट
By Admin | Updated: March 2, 2015 01:40 IST2015-03-02T01:40:35+5:302015-03-02T01:40:35+5:30
एका व्यक्तीच्या घरवापसीमुळे शत्रूंची संख्या एकाने कमी होते आणि एका हिंदू व्यक्तीच्या धर्मांतरामुळे शत्रंूच्या लोकसंख्येत एकाने वाढ होते

‘घरवापसी’ने शत्रूंच्या संख्येत घट
बेळगाव : एका व्यक्तीच्या घरवापसीमुळे शत्रूंची संख्या एकाने कमी होते आणि एका हिंदू व्यक्तीच्या धर्मांतरामुळे शत्रंूच्या लोकसंख्येत एकाने वाढ होते, असे खळबळजनक वक्तव्य गोरक्ष पीठाचे महंत, खासदार योगी आदित्यनाथ यांनी रविवारी येथे केले.
विश्व हिंदू परिषदेच्या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्र येऊन अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची वेळ आली आहे. अखंड हिंदू राष्ट्राचा उद्देश पूर्ण झाला नाही. त्याला कारण जातीवर आधारित भेदभाव आणि अस्पृश्यता हेच आहे. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भेदभाव आणि अस्पृश्यतेला तिलांजली देणे आवश्यक आहे
परकीयांच्या आक्रमणामुळे मोठ्या संख्येने हिंदूंचे धर्मांतर झाले असून, आता त्यांना गुदमरल्यासारखे होत आहे. त्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचे आहे. आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे. भारतातील मुस्लीम सुरक्षित आणि शांततापूर्ण जीवन जगत आहेत, त्याचे कारण म्हणजे हिंदू धर्माची सहिष्णुता आहे, असे त्यांनी सांगितले. गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतीक असल्यामुळे गोहत्या बंदी करण्याची मागणी त्यांनी केली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना खूश करण्यासाठीच कर्नाटकात हिंदूंविरोधी कृत्य करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)