राज्य सरकारचे पुनश्च हरिओम, पहिला दिवस रांगेचा अन् गर्दीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 06:22 AM2020-06-09T06:22:30+5:302020-06-09T08:41:16+5:30

पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली.

Hirom of the state government, the first day of the queue and the crowd | राज्य सरकारचे पुनश्च हरिओम, पहिला दिवस रांगेचा अन् गर्दीचा

राज्य सरकारचे पुनश्च हरिओम, पहिला दिवस रांगेचा अन् गर्दीचा

Next

मुंबई/ ठाणे/ पालघर/ नवी मुंबई/ अलिबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन-अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ लॉकडाऊनमध्ये काढल्यानंतर सोमवारपासून ‘अनलॉक’चा पुढचा टप्पा सुरू झाला. मात्र सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सोय नसल्याने कार्यालये गाठण्यासाठी निघालेल्यांचे अतोनात हाल झाले. सकाळपासूनच ठिकठिकाणी गर्दी, लांबचलांब रांगा आणि वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला.

मुंबईच्या जनजीवनाने कोरोनापूर्व काळ गाठला. लोकल वाहतूक, शॉपिंग मॉल व प्रार्थनास्थळे बंद होती, हाच अपवाद आजच्या गर्दीत होता. मास्कचा अपवाद वगळता नेहमीची लगबग, घाई, वाहतूककोंडी, गर्दीचे चित्र मुंबईसह उपनगरांत व ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मुंबईत कामासाठी येताना दोन ते पाच तास लावाव्या लागलेल्या रांगा, नंतर वाहतूक कोंडी व घरी परतताना पुन्हा त्याच स्थितीत अडकून नोकरदारांचे हाल झाले. रेल्वे वाहतूक बंद असल्याने रस्ते वाहतुकीच्या मर्यादांमुळे अनेकांना कार्यालयात पोहोचण्यासाठी पाच ते सात तास कसरत करावी लागली. ठाणे, डोंबिवली, कल्याण ते कर्जत, कसारा, भार्इंदर, वसई-विरार, पनवेल, नवी मुंबई या परिसरातून मुंबईकडे येणारे मेटाकुटीला आले. एसटी, परिवहन सेवा, खासगी टॅक्सी या अपुऱ्या पडल्या. पुनश्च हरिओमच्या तिसºया टप्प्याला सोमवारी दहा टक्के मनुष्यबळाने कार्यालये सुरू झाली. खासगी व प्रवासी वाहनांना परवानगी आहे.

अपेक्षित उपस्थिती नाही
नवी मुंबईकरांनीही बसची संख्याही कमी असल्यामुळे खासगी वाहनांना प्राधान्य दिले. तर नवी मुंबईतील अनेक कार्यालयांमध्येही बाहेरून येणाºया अनेकांना पोहोचण्यात अडचणी आल्या. त्यामुळे येथील कार्यालयांमध्ये अपेक्षित उपस्थिती नव्हती.

ठाण्यात वाहनांची, डोंबिवलीत प्रवाशांची रांग

ठाणे जिल्ह्यातील अनेकांना खासगी वाहनाने मुंबई गाठावी लागली.
त्यामुळे सकाळी ७ ते १० दरम्यान पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर टोलनाका परिसरात मुंबई व ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे दिवा, कल्याण-डोंबिवली आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत बससेवा तोकडी पडल्याचे पाहायला मिळाले.

बस पकडण्यासाठी डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात कर्मचाºयांची सुमारे दोन किलोमीटरपर्यंत रांग लागली होती. बसमध्ये चढण्यासाठी अनेकांना दोन ते पाच तास रांगेत उभे राहावे लागल्याने त्यांचे हाल झाले. या रांगातही सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला. मीरा रोड- भार्इंदरमध्येही अशाच रांगा पाहायला मिळाल्या.

बससाठी चढाओढ
बसथांब्यावर शारीरिक अंतर पाळणारे मुंबईकर बसमध्ये चढताना मात्र नेहमीप्रमाणे झुंबड करत असल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. कोरोनापूर्व काळातील सवयीप्रमाणे झटापट, धक्काबुक्की करतच बसचे स्वागत होत असल्याचे पाहायला मिळाले.

वसई-विरारमध्ये सकाळपासूनच झुंबड
वसई-विरारमधून मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांची सकाळपासूनच झुंबड उडाली होती. विरार, नालासोपारा तसेच वसई येथून मुंबईला जाणाºया एसटी बसकरिता काही किलोमीटरच्या रांगा लागल्याने प्रवाशांना अनेक तास ताटकळत उभे राहावे लागले. दरम्यान, या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडालेला दिसला.

Web Title: Hirom of the state government, the first day of the queue and the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.