अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाला हिंदू जनजागृती समितीचा ‘खो’

By Admin | Updated: July 23, 2015 16:24 IST2015-07-23T00:45:56+5:302015-07-23T16:24:16+5:30

करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध केल्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आलेच नाहीत

Hindu Janajagruti Samiti's 'Kho' to conserve the statue of Ambabai | अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाला हिंदू जनजागृती समितीचा ‘खो’

अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाला हिंदू जनजागृती समितीचा ‘खो’

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवर करण्यात येणारी रासायनिक संवर्धन प्रक्रिया अधार्मिक असल्याचे सांगत हिंदू जनजागृती समितीने तिला विरोध केल्यामुळे पुरातत्व खात्याचे अधिकारी या प्रक्रियेसाठी बुधवारी आलेच नाहीत. मात्र, मूर्तीवरील धार्मिक विधी थांबविणे शक्य नसल्याने ते सुरुच ठेवण्याचा निर्णय श्रीपूजकांनी घेतल्यामुळे, हा मुद्दा संवेदनशील बनला आहे. या प्रकारामुळे मंदिर परिसरात चिंतेचे वातावरणपसरले आहे. तब्बल २२ वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वीचे धार्मिक विधी बुधवारी सकाळपासून सुरू झाले. मात्र, हिंदू जनजागृती समितीने विरोध केल्यामुळे व विषय धार्मिकदृट्या संवेदनशील असल्याने आम्ही ही प्रक्रिया करण्यासाठी येऊ शकत नसल्याचे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजता श्रीपूजक मंडळाला दूरध्वनीवरून कळवले.
हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी पाठविलेल्या या पत्रामुळे केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मुख्य अधिकाऱ्यांनी रासायनिक संवर्धनासाठी कोल्हापुरात येणारे अधिकारी एम. के. सिंग यांच्यासह सर्व सहकाऱ्यांना दूरध्वनीवरून या प्रक्रियेसाठी कोल्हापूरला सध्या तरी जाऊ नका, असा आदेश दिला आहे. ही माहिती पुरातत्वच्या अधिकाऱ्यांनी करवीरनिवासिनी हक्कदार श्रीपूजक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संध्याकाळी सांगितली. त्यानंतर श्रीपूजक मंडळातर्फे अजित ठाणेकर, गजानन मुनीश्वर व माधव मुनीश्वर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, वैकल्पिक वाद निवारण केंद्रात झालेल्या तडजोडीत न्यायालयाने अंबाबाई मूर्तीवर ३० आॅगस्टपूर्वी रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जावी, असा आदेश दिला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रासायनिक संवर्धन ही प्रक्रिया अधार्मिक असती तर छत्रपती, शंकराचार्य, धर्माचार्य, शास्त्री, पंडित त्यात सहभागी झाले नसते. विरोध करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना आम्ही वारंवार चर्चेसाठी आवाहन केले होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. आता धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे, हे कार्य देवीच पार पाडेल. (प्रतिनिधी)

अंबाबाईची मूर्ती हा सर्वांसाठीच श्रद्धेचा विषय आहे. त्याचे गांभीर्य समजून घेत मूर्तीवरील प्रक्रियेला विरोधच होता कामा नये. आता धार्मिक विधी सुरू झाल्याने विषय थांबविता येणार नाही. उद्याच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांशी आणि श्रीपूजकांशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढला जाईल.
- अमित सैनी, जिल्हाधिकारी


मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेला विरोध होणे हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे आमच्या वरिष्ठांनी कोल्हापूरला जाणे थांबवा, असे सांगितले आहे.
एम. के. सिंग,
अधिकारी, पुरातत्व खाते


नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी : नाझरे
हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय पुरातत्व खात्याला विरोधाचे पत्र पाठविले आहे. पत्रात म्हटले आहे की, ‘अंबाबाईच्या मूर्तीवर १९५५ मध्ये वज्रलेप झाला आहे. त्यानंतरही मूर्तीची सातत्याने झीज झाली शिवाय मूर्ती भंग पावली आहे. तिच्यावर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली तर मूर्तीमधील सत्त्व तेज लुप्त होईल. त्यामुळे पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया करू नये. सध्या असलेल्या मूर्तीच्या जागी नवीन मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात यावी.’

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे हा विषय पुढे मार्गी लागला होता. त्यामुळे या सर्व प्रकाराची माहिती त्यांना मेलद्वारे पाठवून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केल्याचेही श्रीपूजकांनी सांगितले.

Web Title: Hindu Janajagruti Samiti's 'Kho' to conserve the statue of Ambabai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.