Hindi Language Decision: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सुत्रावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदी सक्तीवरुन राज्यातील सामान्य नागरिकांसोबतच विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. हा सर्व विरोध पाहून आज अखेर राज्य सरकारने हिंदी सक्ती बाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. दरम्यान, या घोषणेनंतर ५ जुल रोजी होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चाही रद्द करण्यात आला आहे. शिवसेना खासदार(उबाठा) संजय राऊत यांनी ही माहिती दिली.
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाला तीव्र विरोध सुरू होता. मात्र, आज अखेर हा विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत. तसेच डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना केली असून, या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्रिभाच्या सूत्रांच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी? ती कशा प्रकारे करावी? मुलांना कोणता पर्याय द्यावा? याबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्त्वात एका समितीची स्थापना करण्यात येईल. या समितीचा अहवाल आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र या लागू केला जाईल. म्हणूनच 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली.