राज्यभरात हायअॅलर्ट
By Admin | Updated: July 28, 2015 03:22 IST2015-07-28T03:22:10+5:302015-07-28T03:22:10+5:30
पंजाब हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रमुख महानगरांतील महत्त्वाची, गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे.

राज्यभरात हायअॅलर्ट
मुंबई : पंजाब हल्ल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रमुख महानगरांतील महत्त्वाची, गर्दीच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून सूचना आल्याने हायअॅलर्ट जारी करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या परिसरातील संशयास्पद वस्तू, व्यक्तीबाबतची माहिती तातडीने नजीकच्या पोलीस यंत्रणेला कळवावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
स्वातंत्र्यदिनावरही दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मक्बूल खान अतिरेकी हल्ला करू शकतो. त्याला पाकिस्तानी सेना आणि आयएसआय या हल्ल्यात मदत करण्याची शक्यता आहे, असा सतर्कतेचा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून सर्व राज्यांना देण्यात आलेला आहे. (प्रतिनिधी)
पोलीस बंदोबस्त वाढविला
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांना विशेष दक्षता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत सिद्धिविनायक मंदिर, गेट वे आॅफ इंडिया, दूतावास, सर्व प्रमुख रेल्वे स्थानके व अन्य प्रमुख ठिकाणी तातडीने अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. १५ आॅगस्टपर्यंत ही सतर्कता कायम असणार आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू असल्याने त्या ठिकाणी घातपाती कृत्य होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी़ परिसरात आढळणाऱ्या संशयास्पद व्यक्ती, वस्तूबाबत तातडीने कळवून पोलिसांना सहकार्य करावे.
- संजीव दयाळ, पोलीस महासंचालक