नाइटलाइफवरून हायकोर्टाने सरकारला फटकारले
By Admin | Updated: March 14, 2015 05:57 IST2015-03-14T05:57:19+5:302015-03-14T05:57:19+5:30
मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच उच्च न्यायालयाने शुक्रवारी महिला सुरक्षित झाल्यानंतरच याबाबतची अंमलबजावणी करा, असे राज्य शासनाला फटकारले.

नाइटलाइफवरून हायकोर्टाने सरकारला फटकारले
मुंबई : मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच उच्च न्यायालयाने शुक्रवारी महिला सुरक्षित झाल्यानंतरच याबाबतची अंमलबजावणी करा, असे राज्य शासनाला फटकारले.
नाइटलाइफला परवानगी दिल्यास त्याचा महिला सुरक्षेवर काय परिणाम होईल, याचा विचार केला आहे का, असा सवाल गेल्या आठवड्यात न्यायालयाने उपस्थित केला होता़ याबाबत निर्णय अद्याप झालेला नसल्याने प्रत्युत्तर सादर करण्यास अजून तीन आठवड्यांची मुदत द्यावी, अशी विनंती सरकारी वकील गीता शास्त्री यांनी केली़
न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने ही विनंती मान्य केली़ मात्र नाइटलाइफ सुरू करण्याचा निर्णय झाल्यास याचा महिला सुरक्षेवर काय परिणाम होईल; ते शासनाने न्यायालयात स्पष्ट करायला हवे आणि तोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, असे खंडपीठाने शासनाला बजावले़
महिला अत्याचाराचा गुन्हा अजामीनपात्र करावा, यासह महिला अत्याचाराशी संबंधित अन्य तीन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत़ त्यावरील सुनावणीत न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत़ (प्रतिनिधी)