हेपॅटायटीस, टायफॉइडच्या रुग्णांत वाढ
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30
पावसाळ्यानंतर दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या हेपॅटायटिस आणि टायफॉईड या आजारांचे प्रमाण यंदा पावसाळ्याआधीच वाढले आहे

हेपॅटायटीस, टायफॉइडच्या रुग्णांत वाढ
मुंबई : पावसाळ्यानंतर दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या हेपॅटायटिस आणि टायफॉईड या आजारांचे प्रमाण यंदा पावसाळ्याआधीच वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पाच महिन्यांतच हेपॅटायटिसच्या रुग्णांमध्ये २५ टक्के तर टायफॉईडच्या रुग्णांमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
२०१५ मध्ये हेपॅटायटिसचे १ हजार १८४ रुग्ण आढळले होते. यंदा जानेवारी ते मे दरम्यान ६५७ रुग्ण आढळले आहेत. टायफॉईडचे गेल्यावर्षी १ हजार ३२४ रुग्ण आढळले होते. तर, यंदा आजपर्यंत ५७९ रुग्ण आढळले आहेत.
गेल्यावर्षी लेप्टोच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. त्यामुळे यंदा लेप्टोला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. प्रत्येक वॉर्डमधील प्राण्यांची व्हेटर्नरी डॉक्टरकडून तपासणी करण्याची आणि लसीकरणा मोहीम
हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर तबेला मालकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका सहआयुक्त आय. ए. कुंदन यांनी दिली. (प्रतिनिधी)
>पावसाळ्यासाठी पालिका सज्ज
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेने धूर फवारणीला सुरुवात केली आहे. २७ वॉर्डमध्ये फवारणी सुरू आहे. झोपडपट्टी भागात अडगळीत टाकलेल्या वस्तू, टायर यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. खासगी मालकीच्या ३ हजार ६१८ पाण्याच्या साठ्यांची तर, महापालिका जागांमधील २ हजार ४०६ पाण्याच्या साठ्यांची तपासणी करण्यात आली आहे. कोणत्याही ठिकाणी साचलेले पाणी अथवा अडगळ आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सांगितले.
>रुग्णालयात २ हजार २२३ खाटा राखीव
पावसाळा सुरू झाल्यावर डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, हेपॅटायटिसच्या रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे २ हजार २२३ खाटा पावसाळी आजारांसाठी राखीव ठेवल्या आहेत. रुग्ण वाढल्याने महापालिका रुग्णालयांत रुग्णांना जमीनवर गादी घालून ठेवावे लागते. हे होऊ नये म्हणून आधीच खाटा राखीव ठेवल्या आहेत. त्याचबरोबर औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
>पावसाळ््यात दूषित पाणी आणि अन्न पदार्थांमुळे आजार होण्याचा धोका असतो. अन्न व औषध प्रशासनाने पाण्याचे आणि बर्फाचे नमुने यांची चाचणी सरू केली आहे. ८ नमुने घेण्यात आले आहेत. त्यांच्या चाचण्या सुरु आहेत. अहवाल आल्यावर आणखी नमुने घ्यायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल.- सुरेश अन्नपूर्णे, सहआयुक्त (अन्न) एफडीए