‘सांगत्ये ऐका’ पाहिला फक्त ३० पैशांत!

By Admin | Updated: September 3, 2015 00:24 IST2015-09-03T00:24:39+5:302015-09-03T00:24:39+5:30

ज्येष्ठांनी दिला आठवणींना उजाळा : अनंत माने नावाची जादू कायम; चित्रपट पाहण्यासाठी शाहू स्मारक भवनचे सभागृह प्रेक्षकांनी फुलले

'Hear the Communities' Only 30 Money! | ‘सांगत्ये ऐका’ पाहिला फक्त ३० पैशांत!

‘सांगत्ये ऐका’ पाहिला फक्त ३० पैशांत!

कोल्हापूर : अनंत मानेंचे त्याकाळी प्रदर्शित झालेले ‘सांगत्ये ऐका’, ‘सवाल माझा ऐका’ हे चित्रपट आम्ही ३० पैशांत पाहिले होते. त्यावेळी त्यांच्या चित्रपटांची मोहिनीच इतकी होती की, प्रत्येक चित्रपट किमान दोन-तीन वेळा आम्ही पाहायचो. जवळपास ५०-६० वर्षांनी पुन्हा तेच कृष्णधवल चित्रपट पाहण्याचा अनुभव म्हणजे आमच्या तारुण्यातील आठवणींना उजाळा आहे, अशा शब्दांत रसिकांनी अनंत माने यांच्या चित्रपटांना दाद दिली. बाहेर लावलेली चित्रपटांची छायाचित्रे, पोस्टर्स पाहण्यासाठी त्यांची पावले त्या ठिकाणी थांबत होती.


मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजविलेले दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने त्यांच्या चित्रपटांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत गेले दोन दिवस सांगत्ये ऐका, धाकटी जाऊ, रंगपंचमी, सवाल माझा ऐका, केला इशारा जाता जाता, हे चित्रपट दाखविण्यात आले. अनंत माने नावाची आणि त्यांच्या चित्रपटांची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले. प्रत्येक चित्रपटाला शाहू स्मारक भवनचे सभागृह प्रेक्षकांनी फुलून गेलेले आहे. यात उच्चांकी गर्दी होती ती ‘सांगत्ये ऐका’ चित्रपटाला. मिळेल त्या ठिकाणी बसून रसिकांनी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटांना तरुणाईपेक्षाही जास्त गर्दी आहे ती वयाची साठी गाठलेल्या प्रेक्षकांची. त्यांच्या तारुण्याच्या काळात क्रेझ असलेले हे चित्रपट पाहण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने मिळाली.
चित्रपट पाहायला आलेले रामचंद्र साळवी म्हणाले, ‘सांगत्ये ऐका’ हा चित्रपट पद्मा टॉकीजला लागला होता, तेव्हा आम्ही तरुण होतो. त्यावेळी चित्रपट पाहण्याचा अनुभव फार वेगळा होता. आता पुन्हा एकदा तोच चित्रपट पाहताना त्या काळच्या आठवणींना उजाळा मिळाला असून, आनंद वाटला. खास चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या खडकलाटच्या पवित्रा म्हेत्रे म्हणाल्या, सवाल माझा ऐका, सांगत्ये ऐका हे चित्रपट आम्ही त्यावेळी ३० पैशांत पाहिले होते. तेव्हा मी लहान असल्याने कथाही आठवत नव्हती. आज मात्र पुन्हा तोच चित्रपट पाहताना छान वाटलं. पूर्वीच्या चित्रपटांची मजा काही औरच असते.
अनंत माने यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांतले संवाद व गीतांचे बोल. तब्बल ६० वर्षांनी हे चित्रपट पुन्हा पाहणारे ज्येष्ठ नागरिक आणि आताची पिढीही त्या संवादांना टाळ्यांनी दाद देत होती. सवाल-जबाबसारख्या गाण्यांना शिट्ट्यांनी प्रतिसाद देत होते. सभागृहातून बाहेर आले की, दारात लावलेले पोस्टर्स पाहण्यासाठी रसिकांची पावले तेथे थांबत. विशेषत: चित्रपटातील प्रसंगांवर आधारित छायाचित्रे पाहण्याचे कुतूहल रसिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. (प्रतिनिधी)



चित्रपटसृष्टीच्या बदलत्या काळाची पावले ओळखा...
चित्रपट व्यावसायिकांचा मेळावा उत्साहात
कोल्हापूर : मराठी चित्रपट निर्मिर्तीकडे निर्मात्यांनी केवळ मनोरंजन म्हणून न पाहता व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहावे. सध्या आपल्याकडे दर्जाहीन चित्रपटांची संख्या वाढते आहे. ती कमी होणे गरजेचे आहे. चित्रपटसृष्टीचा ट्रेंड आता बदलत आहे, त्याच्याशी स्पर्धा करायची तर या बदलाची पावले ओळखून निर्मात्यांनी एकत्र येऊन बिग बजेटचा चित्रपट निर्माण करण्याची गरज आहे, असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी व्यक्त केले.
शाहू स्मारक भवनमध्ये चित्रपट महामंडळातर्फे आयोजित अनंत माने चित्रपट महोत्सवांतर्गत झालेल्या चित्रपट व्यावसायिकांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उपस्थित व्यावसायिकांनी कोल्हापूर चित्रनगरी, स्थानिक कलाकारांच्या समस्या, निर्मात्यांची कमी होत असणारी संख्या, चित्रपट निर्मिर्तीत येणारे अडथळे याबाबत स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते यांच्या समस्या मांडल्या.
आकाराम पाटील म्हणाले, कोल्हापुरात चित्रपट निर्मिर्तीसाठी पोषक वातावरण आहे; पण निर्मात्यांची संख्या खूपच कमी होत आहे. अद्ययावत तंत्रज्ञान अंगीकृत असणारे निर्माते निर्माण होणे आवश्यक आहे, त्यासाठी निर्मात्यांची कार्यशाळा घ्यायला हवी. उत्कर्ष कुरबेट्टी यांनी तमिळ, तेलगू चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटही इतर भाषांमधून डब करून त्या-त्या राज्यांत दाखविले जावेत; जेणेकरून मराठी चित्रपटही चांगला व्यवसाय करू शकेल, अशी सूचना केली.
अभिनेते आनंद काळे म्हणाले, निर्मात्यांचे जर नुकसान झाले तर त्यांनी कलाकारांना दोषी ठरवू नये. तुम्हाला माहीत असेल तरच चित्रपट करण्याचं शिवधनुष्य पेलावं. शिवसेनेच्या शुभांगी साळोखे यांनी वृद्ध कलाकारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्याची सूचना मांडली. त्याचबरोबर राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धांमधून अभिनय करणाऱ्यांना चित्रपटात संधी मिळावी यासाठी मोठे दिग्दर्शक, निर्माते यांना या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं जावं, अशी वेगळी सूचना मांडली.
यास उत्तरे देताना विजय पाटकर म्हणाले, मराठी चित्रपट चालवायचा असेल तर त्यासाठी निर्मात्याचं आर्थिक नियोजन महत्त्वाचं आहे. चित्रपटाचं बजेट ठरवून घ्यावं. पब्लिसिटीसाठी अधिकाधिक पैसा खर्च करावा व महत्त्वाचं म्हणजे एक व्यवसाय म्हणूनच चित्रपटाकडे पाहवे. मेळाव्याला अनिल निकम, बाळकृष्ण बारामती, मिलिंद अष्टेकर, सुभाष भुर्के, सदानंद सूर्यवंशी यांच्यासह अनेक चित्रपट तंत्रज्ञ, व्यावसायिक, निर्माते उपस्थित होते.



चित्रनगरीचे काम केंद्रातूनच थांबले : पाटकर
सुसज्ज चित्रनगरी ही कोल्हापूरची अस्मिता आहे; पण तिच्या पुनरुज्जीवनासाठीचा पाठपुरावा योग्यरीत्या होत नाही. केंद्रात ‘फिक्की’ या संस्थेकडून चित्रपट उद्योगाबद्दलचे निर्णय घेतले जातात; त्यामुळे चित्रनगरीसाठी दिग्दर्शक भास्कर जाधव आणि सुभाष भुर्के यांच्याकडून आलेला अहवाल ‘फिक्की’ला सादर करू व भविष्यात अध्यक्ष नसलो, तरी या प्रश्नांचा मी पाठपुरावा करणार असल्याचे मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितले.

चित्रपट महोत्सवाचा आज समारोप
ंअनंत माने चित्रपट महोत्सवाचा आज, गुरुवारी समारोप होत आहे. दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. यावेळी चित्रपट महामंडळातर्फे वृद्ध कलाकारांना मानधन योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता ‘एक गाव, बारा भानगडी,’ दुपारी एक वाजता ‘दोन बायका फजिती ऐका’ हे दोन चित्रपट दाखविले जातील. रात्री आठ वाजता ‘सुशीला’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल.

महामंडळाने घेतलेले निर्णय
सप्टेंबरअखेर महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार
टॅलेंट कार्डर्ची वेबसाईट लॉँच करणार
महामंडळाचे दोन स्थानिक समन्वयक नेमणार
आरोग्य शिबिराचे आयोजन

Web Title: 'Hear the Communities' Only 30 Money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.