‘आदिवासी मुलांची आरोग्य तपासणी करा’
By Admin | Updated: June 9, 2016 04:19 IST2016-06-09T04:19:51+5:302016-06-09T04:19:51+5:30
सर्वच अंगणवाड्यांतील मुलांची पावसाळ्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यासाठी फिरती आरोग्य पथके नेमावी, तसेच या भागात सातत्याने आरोग्य शिबिरे घ्यावी

‘आदिवासी मुलांची आरोग्य तपासणी करा’
ठाणे : नवसंजीवन योजनेंतर्गत जिल्ह्यातील आदिवासी भागामधील सर्वच अंगणवाड्यांतील मुलांची पावसाळ्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यासाठी फिरती आरोग्य पथके नेमावी, तसेच या भागात सातत्याने आरोग्य शिबिरे घ्यावी. त्याचबरोबर दुर्गम व अतिसंवेदनशील क्षेत्राबरोबर आदिवासी भागात अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आदिवासी विभागामार्फत वाहन उपलब्ध करून तो कसा सुरळीत होईल, याकडे लक्ष देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सूचना केल्या आहेत.
या योजनेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक झाली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेण्यात येईल. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांशी संपर्क होण्यासाठी रस्त्यांची डागडुजी करण्यास त्यांनी सांगितले. आदिवासी क्षेत्रातील श्रेणी-३ व श्रेणी-४ मधील सर्व बालकांना आंतररु ग्ण सेवा व तातडीने औषधोपचार कसे मिळतील, त्याचबरोबर या भागात रोजगार कसा मिळेल, याकडे लक्ष द्यावे.
खावटी कर्जवाटप व्यवस्थित करा. अंगणवाड्यांना पूरक पोषक आहार त्वरित कसा मिळेल, याकडे लक्ष देण्यात यावे. आदिवासी भागातील शहापूर २३३, भिवंडीतील ७३, मुरबाड ७७ व अंबरनाथ तालुक्यातील ४ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (जेडब्ल्यूएसएम) यांनी तत्काळ तपासणी करावी, अशी सूचना दिली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, जिल्हापुरवठा अधिकारी डॉ. मोहन नळदकर व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)