Gargi Harshvardhan Sapkal on Tipu Sultan: मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून महाराष्ट्रात वाद सुरु झाला होता. याचदरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुलना करून नव्या वादाला तोंड फोडले. यावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर टीका केली. इतकेच नव्हे तर अनेक पक्षातील राजकीय मंडळींनी सपकाळ यांच्यावर टीका केली. यादरम्यान, त्यांची लेक गार्गी सपकाळ हिने वडिलांची बाजू घेत फेसबुक पोस्टमधून थेट टीकाकारांना सुनावले.
गार्गी हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की...
महाराष्ट्रातील प्रियजनांनो, माझ्या वडिलांच्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून सध्या राज्यात जाणीवपूर्वक गदारोळ उभा केला जात आहे. हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी नाही, तर त्यांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे. ज्यांनी सातत्याने महाराजांच्या विचारांना आणि इतिहासाला विकृत करण्याचं काम केलं आहे, तेच आज अचानक अपमान झाल्याचं ढोंग करत आहेत, हीच या संपूर्ण गदारोळामागची खरी राजकीय चाल आहे. खरं तर माझ्या वडिलांचं मूळ वक्तव्य अतिशय स्पष्ट आणि संदर्भासह होतं. “शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी कार्य केलं. महाराजांप्रमाणेच त्यांनी कुठल्याही विखारी, विषारी विचारांना थारा दिला नाही,” हा त्या वक्तव्याचा आशय होता.
हा संदर्भ एका विशिष्ट प्रश्नाशी जोडलेला होता. विविध जाती आणि धर्मांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तेढीच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी अशी मागणी केली होती की सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महामानवांचे फोटो लावावेत, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतान यांचेही फोटो असावेत. “या मागणीकडे आपण कसं पाहता?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरात, वरील संदर्भात हे वक्तव्य करण्यात आलं. पण आज त्याच वक्तव्याचा हेतुपुरस्सर विपर्यास केला जात आहे.
यांच्याच लाडक्या भगतसिंग कोश्यारी यांनी “शिवाजी महाराज आता जुने झाले, नवे आयडॉल नितीन गडकरी” अशी अपमानास्पद तुलना केली, फुले दाम्पत्याचा अपमान केला, तेव्हा या सत्ताधाऱ्यांच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. उलट अशा व्यक्तीला महाराष्ट्रभूषण देऊन त्यांनी महाराजांप्रती आपली खरी मानसिकता उघडी पाडली. कोरटकर या मा. फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीकडून महाराजांचा अपमान होतो, तेव्हा हे गप्प बसतात. “मोदी म्हणजे शिवाजी महाराज” अशी इतिहासाची विकृती करणाऱ्या महंतांना प्रश्न विचारत नाहीत. राजमाता जिजाऊसाहेबांबद्दल वादग्रस्त आणि अवमानकारक लिखाण करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना कधी जाब विचारला गेला नाही. म्हणजे जेव्हा अपमान त्यांच्या विचारसरणीतून होतो तेव्हा तो चालतो, हीच या सत्ताधाऱ्यांची दुटप्पी, दडपशाही आणि निवडक नैतिकतेची राजकारणाची परंपरा आहे.
माझे वडील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणारे आणि त्यांच्या समता, न्याय व लोककल्याणाच्या आदर्शांवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण ज्यांना महाराजांचा हा समतेचा आणि न्यायाचा विचार मान्य नाही, ज्यांना फक्त प्रतीकांचा दिखावा प्रिय आहे, तेच लोक समाजात द्वेष पसरवतात, दंगली घडवण्याचं वातावरण तयार करतात आणि स्वार्थी राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करतात. हा तर खरा महाराजांचा अपमान आहे. स्वराज्य म्हणजे प्रेम, शांतता, न्याय आणि लोकांचा सन्मान. पण महाराजांना मानणारे म्हणवून घेऊन जर लोकांची डोकी फोडली जात असतील, तर तो कुठला विचार आहे?
या वादानंतर फेक आयडी तयार करून मला अत्यंत गलिच्छ, स्त्रीद्वेषी आणि अपमानास्पद शिव्या दिल्या जात आहेत. ज्यांना खरंच महाराज कळले असते, ते असं वागले असते का? पण त्यांच्या कार्यशाळा, शाखा आणि प्रचारयंत्रणांमधून जर सातत्याने द्वेषच पेरला जात असेल, तर त्याचेच प्रतिबिंब समाजात दिसणार, यात आश्चर्य ते काय?
शिवराय, जोतिबा–सावित्री फुले, छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महामानवांचा सामाजिक न्याय, समता आणि कल्याणकारी राज्याचा विचार हा आरएसएसच्या ब्राह्मणवादी विचारसरणीच्या मूलत: विरोधात आहे, त्यांना तो मान्य नाही. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या वडिलांच्या शब्दांचा विकृत अर्थ लावून, महाराष्ट्रात हिंदू–मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेही शिवजयंतीच्या उंबरठ्यावर! हे एक स्पष्ट राजकीय षड्यंत्र आहे. महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे दूषित वातावरण तयार करून जयंती साजरी करायची, ही वैचारिक विकृतीच म्हणावी लागेल.
ज्यांची माथी भडकवली जात आहे, त्यांनी हे ओळखायला हवं की फडणवीस आणि ज्या विचारसरणीतून ते प्रेरित आहेत, ती तुमची फसवणूक करत आहे. तुम्हाला, देशाचं आणि महाराष्ट्राचं ऐक्य जपणाऱ्या माणसांच्या विरोधात उभं केलं जात आहे. आपण अजून किती दिवस या विकृतीला बळी पडणार? ही विकृती तुमचं आयुष्य, तुमचं समाजजीवन आणि शेवटी देशाचं भविष्य उद्ध्वस्त करेल. यापासून सावध राहणं हाच आजचा खरा देशभक्तीचा मार्ग आहे.
शेवटी, महाराजांचा विचार काय आहे हे आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. माझे वडील हर्षवर्धन सपकाळ हे अवघ्या २८व्या वर्षी (१९९६ साली) महाराष्ट्रातील सर्वांत तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्याच काळात त्यांनी १९९८ पासून सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा शासकीय जन्मोत्सव सुरू केला हा उत्सव शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रथा त्यांनीच पहिल्यांदा रुजवली. आम्हाला वैचारिक वारशासोबत पारिवारिक वारसा लाभलेला आहे. आमच्या कुटुंबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वारशाशी आणि मराठा राजघराण्यांशी जवळचा संबंध आहे. माझ्या वडिलांची मावशी राजर्षी शाहू महाराजांच्या कदमबांडे घराण्यात लग्न झालेली होती. तसेच, माझ्या आजीचे वडील देवासचे सरदार जाधव होते, जे सिंदखेड राजाच्या जाधव घराण्याशी (जिजाऊ मातोश्रींच्या घराण्याशी) जोडलेले आहेत. आणि माझी आत्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या वंशज घराण्यात विवाहित आहे. माझे आजोबा वसंतराव सपकाळ यांचे मामा वीर वामनराव लोखंडे हैदराबाद मुक्ती संग्रामातील खरे नायक होते. रझाकरांच्या अत्याचारांना तोंड देत, विहिरीभर रझाकार मारून मराठवाड्याच्या मातीला स्वातंत्र्याचा रंग दिला. त्यांच्या शौर्याची आठवण आजही गावोगावी सांगितली जाते. हे सर्व नाते भोसले आणि इतर मराठा राजघराण्यांशी जोडते, पण माझे वडील या ऐतिहासिक वैभवाचा राजकीय उपयोग कधीच करत नाहीत. ही बाब महत्वाची वाटते.
ज्यांचा इतिहास अन्याय, शोषण आणि स्त्रीद्वेषाचा राहिलेला आहे, ज्यांना इथली जातीय उतरंड कायम ठेवायची आहे, ज्यांनी सत्तेसाठी गद्दारीची परंपरा जोपासली आहे अशा विचारसरणीच्या लोकांनी तरी महाराजांच्या विचारांचे धडे महाराष्ट्राला देण्याचं ढोंग करू नये. महाराष्ट्र तुमचे डावपेच ओळखतो. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय बांधवांना माझं एवढंच सांगणं आहे की, आपल्याला प्रेम, करुणा, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभं राहायचं आहे, आणि याच मूल्यांवर महाराष्ट्र घडवायचा आहे. सत्य ओळखा, आणि सत्याच्या बाजूने एकजुटीने उभे राहा. खऱ्या स्वराज्यासाठी एकत्र लढा.
Web Summary : Gargi Sapkal defends her father, Congress leader Harshvardhan Sapkal, amidst controversy over his Tipu Sultan remarks. She accuses critics of political opportunism and selective outrage, highlighting past instances of disrespect towards Shivaji Maharaj by ruling party figures.
Web Summary : टीपू सुल्तान पर हर्षवर्धन सपकाल की टिप्पणी पर विवाद के बीच बेटी गार्गी सपकाल ने उनका बचाव किया। उन्होंने आलोचकों पर राजनीतिक अवसरवाद और चयनात्मक आक्रोश का आरोप लगाया, और सत्तारूढ़ दल के नेताओं द्वारा शिवाजी महाराज के प्रति अनादर के पिछले उदाहरणों को उजागर किया।