शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 10:35 IST

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या बहुप्रसवी, बहुढंगी प्रतिभावंताची कन्या म्हणून शिरीष पै यांना वेगळ्या प्रकारची प्रतिभा लाभली.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या बहुप्रसवी, बहुढंगी प्रतिभावंताची कन्या म्हणून शिरीष पै यांना वेगळ्या प्रकारची प्रतिभा लाभली. ‘मराठा’ वृत्तपत्राच्या साहित्यिक स्वरूपाची जोपासना आणि ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, डिंपल प्रकाशनाचा जणू घरच्याच प्रकाशकांचा आधार मिळाला. तरीही शिरीषताईंचा पॉप्युलरवर विशेष लोभ होता. काही विशेष लेखन झाले की त्यांना आमची आठवण यायची. ‘एकतारी’ हा अभंगांचा संग्रह, ‘एका पावसाळ्यात’ ही मुक्तछंदातील कविता, ‘आईची गाणी’ हा बालगीतसंग्रह, ‘टिप फुले टिप ग’ हा ललितलेखांचा संग्रह त्यांनी मुद्दाम आमच्यासाठी राखून ठेवला.

मराठीतील त्यांचे सहकारी आणि जिवलग स्नेही विजय तेंडुलकर यांनी त्यांची हायकू या जपानी काव्यप्रकाराशी इंग्रजी अनुवादाच्या माध्यमातून ओळख करून दिली. तेव्हा तेंडुलकरांखेरीज कोणालाही हा तीन ओळींचा आणि तरी नियमबद्ध काव्यप्रकार शिरीषताईंचे सगळे जीवन व्यापून टाकेल याची कल्पना नसावी. परंतु जपानी निसर्ग आणि चित्रलिपी यातून उगम पावलेल्या या काव्यप्रकारात भाषिक आणि भौगोलिक बंधने झुगारून देण्याची शक्ती आहे हे जाणून बंगालीत रवींद्रनाथ ठाकूर, हिंदीत सत्यभूषण वर्मा, गुजरातीत स्नेहरश्मी यांनी आपापल्या भाषांतून हायकू लिहिल्या होत्या. या सर्व हायकूंचा अभ्यास करून काही इंग्रजीतून उपलब्ध हायकूंचे मराठीत भाषांतर करण्याचा पद्धतशीर रियाज केला. त्यांनी हायकू या काव्यप्रकारावर अशी वेगवेगळ्या प्रकारे साधना करून प्रभुत्व मिळवले.

त्यांचा सुरुवातीचा एक हायकू संग्रह पॉप्युलरने प्रसिद्ध केला. नंतर त्या हायकू लेखनाने इतक्या झपाटल्या गेल्या की त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर हायकू... हायकू... हायकू... सतत हायकूच...मी म्हणजेच हायकू...! निसर्ग आणि मानवी मन यांच्या संबंधांपलीकडे मानवी सुखदुःखाचे आणि अध्यात्मासारखे विषय त्यांनी हाताळले. शिरीष पै यांनी सुरुवातीला जरी हायकूंचे लेखन फक्त निसर्गाशी जोडले तरी पुढे त्या विषयाच्या कक्षा विस्तारत जाऊन मराठी हायकू हे एक साहित्याच्या क्षेत्रात वेगळे मानाचे दालन मानले जाऊ लागले.

‘ऋचा’चा हायकूला वाहिलेला विशेषांक प्रसिद्ध झाला. शिवाय सुरेश मथुरे यांचे पुस्तक ‘हायकू एक अवलोकन’ हेही प्रसिद्ध झाले. शिरीषताईंचे स्वतःचे इतर लेखन कमी झाले. त्यांनी एका हायकूतच वर्णन केल्याप्रमाणे : हायकू हा माझा स्वभाव आहे... साक्षात प्राण आहे! दरवर्षी आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी १३ ऑगस्टला समारंभपूर्वक हायकूचे एक पुस्तक प्रसिद्ध करण्याचे त्यांनी जणू व्रत घेतले. सतत दहा वर्षे त्यांचे हायकूंचे संग्रह प्रसिद्ध होत राहिले. डिंपल आणि परचुरे तत्पर होतेच. शिरीषताईंच्या निधनानंतर जो श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला तेव्हा त्यांचे हायकू प्रेम अधिकच लक्षात आले. त्यांनी स्वतः असंख्य हायकू लिहिले, भाषांतरित केले, आणि कधी नव्हे ते हायकू या काव्यप्रकाराविषयी सैद्धांतिक लेखनही केले. इतकेच नव्हे तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मराठीत अनेक नवोदित कवी हायकूचे लेखन करू लागले. त्यांना मार्गदर्शनही केले. श्रद्धांजली वाहत असताना बहुतेकांनी शिरीष पै यांचा हायकू या काव्यप्रकाराची अधिष्ठात्री असा उल्लेख केला. स्वतः कवीने त्यांच्या ‘पूर्वा’खेरीज प्रत्येक संग्रहाच्या शीर्षकात हायकू शब्दाचा निर्देश केला.

मराठीत विडंबनकाव्य या प्रकाराचे महत्त्व आले ते आचार्य अत्रे यांच्या ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्यसंग्रहामुळे. त्यांनी ‘केशव कुमार’ या नावाने लिहिलेल्या इतर कवितांचा वाचकांना जणू विसर पडला. नंतरच्या काळात विडंबन कवितांचे पेव फुटले. तरी विडंबनकाव्य म्हणजे अत्रे असे हे समीकरण पक्के झाले, इतका काळ लोटल्यानंतरही ते तसेच आहे. त्याचप्रमाणे हायकू म्हणजे शिरीष पै हे सगळ्यांनी मान्य केल्याचे लक्षात आले.

हायकूचा फक्त एकच संग्रह आम्ही प्रसिद्ध केला असला तरी शिरीषताईंना हायकूच्या जनकत्वाचे श्रेय देणारा त्यांच्या समग्र हायकूंचा संग्रह पॉप्युलरने प्रसिद्ध करावा अशी ईर्षा उत्पन्न झाली, त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातच मी तसे जाहीर केले. त्यांचे सगळे प्रकाशित आणि अप्रकाशित हायकू स्वतंत्र आणि अनुवादित हायकू यांतून निवड करून पुस्तकाला रूप देणे सोपे नव्हते. ते बिकट काम सहृदयतेने त्यांची मैत्रीण आणि स्वतः काव्यलेखन करणारी उषा मेहता यांनी करून दिले. पद्मा सहस्रबुद्धे या निवृत्त असल्या तरी जुने ऋणानुबंध लक्षात ठेवून त्यांनी मुखपृष्ठ तयार करून दिले आणि १५ नोव्हेंबर २०१८ला या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र