महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातने पळवला
By Admin | Updated: September 12, 2014 02:54 IST2014-09-12T02:54:12+5:302014-09-12T02:54:12+5:30
महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्याच्या गोष्टी करणाऱ्या भाजपाने राज्यात येऊ घातलेला नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ कोस्टल पोलिसिंग अकादमीचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये पळवला
महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातने पळवला
मुंबई : महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्याच्या गोष्टी करणाऱ्या भाजपाने राज्यात येऊ घातलेला नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ कोस्टल पोलिसिंग अकादमीचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये पळवला आहे. विशेष म्हणजे, २६/११च्या घटनेनंतर सागरी सुरक्षेसाठीची उपाययोजना म्हणून मुंबईत ही अकादमी स्थापना करण्यात येणार होती.
महाराष्ट्राचा प्रस्ताव का नाकारला याची कोणतीच कारणे, केंद्र सरकारने दिलेली नाहीत. फक्त ही अकादमी गुजरातला मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा महाराष्ट्रावर आणि विशेषत: मुंबईच्या सुरक्षेच्या बाबतीत केंद्राने अन्याय केला असल्याचे सांगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोणतेही कारण नसताना देशाच्या एका कोपऱ्यात ही अकादमी का नेली? महाराष्ट्रात उभारायचीच नव्हती, तर राज्याकडे जमीन का मागितली? केंद्राच्या अधिकऱ्यांनी पालघर येथील जमीन मंजूर केल्यावरही का नाकारली? अकादमी शहराजवळच पाहिजे हा निकष असेल, तर द्वारका हे काय इतर राज्यांच्या तुलनेत मध्यवर्ती शहर आहे का, असे सवालही पाटील यांनी उपस्थित केले.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्याच्या सागरी सुरक्षा करणाऱ्या यंत्रणांना
प्रशिक्षण मिळणार होते. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयानेही अकादमी गुजरातेत नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी द्वारका जिल्ह्यातील पिंडारा (देवभूमी) या गावी २५० एकर जमिनीवर आता ही अकादमी उभी राहील. (प्रतिनिधी)