काश्मीर खोऱ्याचा मराठी पालक
By Admin | Updated: December 30, 2014 01:17 IST2014-12-30T01:17:55+5:302014-12-30T01:17:55+5:30
मी १९९७पासून काश्मीरमध्ये अनाथ मुलांच्या संगोपनाचे काम करीत आहे. अतिरेक्यांनी १९ वेळा माझे अपहरण केले.

काश्मीर खोऱ्याचा मराठी पालक
बाळासाहेब काकडे - श्रीगोंदा
मी १९९७पासून काश्मीरमध्ये अनाथ मुलांच्या संगोपनाचे काम करीत आहे. अतिरेक्यांनी १९ वेळा माझे अपहरण केले. माझ्या डोक्याला एके ४७ बंदूक लावली. त्यांच्या अग्निपरीक्षेत मी पास झालो. ‘इसको मारनेवाला असली मुस्लीम नहीं हो सकता, ये तो खुदा का बंदा है.’ आता माझे १७४ अनाथ मुलींचे कुटुंब झाले आहे. मुलींच्या शिक्षणाचे काम करताना मला मरण आले तर तो माझ्या कामाचा गौरव असेल, आदिक कदम ‘लोकमत’शी बोलताना भावुक झाला होता. आदिक कदम हा श्रीगोंद्याचा सुपुत्र.
पुण्याला कॉलेजमध्ये असताना वर्गातील काश्मिरी मुस्लीम व पंडित मुलांमध्ये वाद व्हायचे. त्याचे कारण सरांना विचारले असता सरांनी परिस्थिती सांगितली आणि काश्मीरला जाऊन सर्व समजून घेण्याचे आव्हानच दिले. त्यानुसार आदिकने काश्मीर गाठले. दोन महिने तो तेथे राहिला. त्यानंतर काश्मीरला येणे-जाणे सुरूच ठेवले.
नातेवाईक किंवा कुटुंबीयांचा मला फारसा पाठिंबा नव्हता. मात्र आई माझ्यामागे उभी राहिली आणि विशेष म्हणजे मित्रांनी मला बळ दिले, असे आदिकने सांगितले.
१९९७ ते २००२पर्यंत काश्मीरच्या मातीतील समस्यांचा आदिकने अभ्यास केला. यादरम्यान आदिकचे एकदा दोनदा नव्हेतर १९ वेळा अतिरेक्यांनी अपहरण केले. एकदा गोळीबारत १४ वर्षांचा मुलगा मारला गेला. त्याचे रक्त आदिकच्या गाडीच्या काचेवर पडले. आदिक खूप व्यथित झाला आणि त्याने काश्मीरमध्येच काम करण्याचा निर्णय घेतला. ‘बॉर्डरलेस’ संस्थेच्या माध्यमातून अतिरेक्यांच्या हल्ल्यात अथवा गोळीबारात ठार झालेल्यांच्या तसेच मरण पावलेल्या अतिरेक्यांच्या मुलींसाठी आदिकने वसतिगृह सुरू केले आहे.
सुरुवातीला येथे अवघ्या १७ मुली होत्या. १२ वर्षांच्या प्रवासात वसतिगृहात १७४ मुलींचे मोठे कुटुंब झाले आहे. आता हाच माझा संसार असल्याचे आदिकचे म्हणणे आहे.
१७४मधील एका मुस्लीम मुलीच्या लग्नात तर आदिकला कन्यादान करण्याचे भाग्य मिळाले. आज तीच मुलगी एका गावची सरपंच झाली आहे.
एक मुलगी शिकली तर कुटुंब संस्कारमय करू शकते आणि मुली शिकल्या तर समाजाची प्रगती होते, याच भावनेतून त्याने स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले आहे. विशेष म्हणझे आदिकला शासनाच्या पैशांची गरज भासली नाही; अथवा त्यानेही मागितली नाही.
बिझनेस सेंटर
महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक बिझनेस सेंटर उभारले असून, फेबु्रवारीत ते सुरू होणार आहे. श्रीगोंद्यातील महामानव बाबा आमटे वसतिगृह माझे श्रीगोंद्यातील घर राहणार असल्याचे आदिक सांगतो.
अतिरेक्यांनी १९ वेळा माझे अपहरण केले. डोक्याला एके ४७ लावली. त्यांच्या अग्निपरीक्षेत मी पास झालो. ‘ये तो खुदाका बंदा है!’ अशी प्रशस्ती मिळाली.