जन्मगाव कोल्हारवर पसरली शोककळा

By Admin | Updated: February 22, 2015 02:16 IST2015-02-22T02:16:09+5:302015-02-22T02:16:09+5:30

ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांच्या निधनाने त्यांच्या जन्मगावी कोल्हार येथे शोककळा पसरली.

The grenade is spread over the Kolhar | जन्मगाव कोल्हारवर पसरली शोककळा

जन्मगाव कोल्हारवर पसरली शोककळा

कोल्हार/राहुरी (अहमदनगर) : ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांच्या निधनाने त्यांच्या जन्मगावी कोल्हार येथे शोककळा पसरली. त्यांचे माध्यमिक शिक्षण झालेल्या राहुरी येथेही त्यांच्या सहकाऱ्यांनी आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर आणि सामाजिक समतेवर हल्ला करून झालेली ही हत्या निषेधार्ह असल्याचे त्यांचे ८३ वर्षीय चूलतबंधू भिमाशंकर पानसरे व पुतणे तसेच भाकपचे राहाता तालुका सचिव सुरेश पानसरे यांनी सांगितले.
गोविंद पानसरे यांना विष्णू, मधुकर, संपत व दौलत हे चार बंधू. गोविंदराव यांचा क्रमांक तिसरा. त्यांचे चारही बंधू आज हयात नाहीत. पानसरे यांचे सर्व कुटुंबीय कम्युनिस्ट विचारसरणीचे आहे. त्यांच्या दोन दिवंगत भगिनी इंदूताई हरिभाऊ तवले व शकुंतला अकोलकर अहमदनगर येथे वास्तव्यास होत्या. पानसरे यांच्या दोन मुलींपैकी स्मिता बन्सी सातपुते या नेवासे येथे, मेघा या नाशिकला प्राध्यापक आहेत. त्यांच्या एकुलता मुलगा अविनाश यांचे २ आॅक्टोबर २००३ मध्ये हृदयविकाराने निधन झाले. त्यांची सून मेघा या कबीर व मल्हार या दोन मुलांसह कोल्हापूर येथे राहतात. पानसरे यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हार येथे, तर माध्यमिक शिक्षण अहमदनगर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरला जावे लागले. नंतर तीच त्यांची कर्मभूमी बनली.

लसूण विकून शिक्षण
राहुरीतील विद्यामंदिर प्रशालेत पानसरे यांनी आठवीच्या वर्गात १ मार्च १९४९ रोजी प्रवेश घेतला़ लसूण विकून त्यांनी शिक्षण घेतले. पत्की गुरूजींनी सुरू केलेल्या बोर्डिंगमध्ये ते वास्तव्याला होते़ त्यांच्याकडे एकच पोषाख होता. मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरूध्द त्यांनी मोर्चा काढला होता़ त्या प्रकरणात मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले़ शाळेच्या बांधकामासाठी दगड, विटा व वाळू जमा करून श्रमदानाने त्यांनी चार खोल्या बांधल्या. अकरावीपर्यंतचे त्यांचे शिक्षण (२१ फेबु्रवारी १९५२) राहुरीत पूर्ण झाले.

शोकसंदेश
कॉ. पानसरे हे सामाजिक चळवळीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सामान्यांवर होणाऱ्या अन्यायासाठी लढा दिला. एका सामाजिक विचारवंताला महाराष्ट्रासह देश मुकला आहे.
- अण्णा हजारे, जेष्ठ समाजसेवक
’’
एका नि:स्वार्थी विचारवंताची अशा पद्धतीने हत्या हे निव्वळ भ्याडपणाचे कृत्य आहे. गुन्हेगारांना पकडून योग्य शासन करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा मला विश्वास आहे.
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल
’’
गोविंद पानसरे यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीचा आधारवड कोसळला आहे. पानसरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गरिबांसाठी लढा दिला.
- शिवाजीराव देशमुख, सभापती, विधानपरिषद
’’
पानसरे यांची हत्या म्हणजे समता, न्याय, आचार, शुद्ध चारित्र्यावर झालेला हल्ला आहे. पानसरे यांच्यासारखी माणसे समाजाला हलवितात, म्हणून त्यांच्यावर भ्याड हल्ले होतात.
- मेधा पाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
’’
धार्मिक शक्ती वाढत असून, त्यांचा प्रभाव वाढत जाणे हे दुर्दैवी आहे. दाभोलकर असोत वा पानसरे असोत; यांच्यावरील हल्ला म्हणजे न्याय व समतेवरील हल्ला आहे.
- दत्ता इस्वलकर, कामगार नेते
’’
पानसरे यांच्यावरील हल्ला आणि त्यांचा मृत्यू हे विचारांवरील हल्ल्यासारखे आहे; पण त्यांच्यावर हल्ले करून विचार मारता येणार नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
- प्रकाश रेड्डी, ज्येष्ठ नेते, भाकप
’’
पानसरे यांची मृत्यूसोबतची लढाई संपली असली तरी त्यांनी आयुष्यभर दिलेला विचार, लढा मात्र कदापि संपणार नाही.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
’’
ज्यांना विचारांची लढाई विचाराने लढता येत नाही, तेच हिंसा करतात. डॉ. दाभोलकरांचे मारेकरी तर अजून सापडले नाहीत, पण या मारेकऱ्यांचा मेंदू महाराष्ट्रात कार्यरत आहे, हे काही लपून राहिलेले नाही.
- कपिल पाटील, आमदार
’’
पानसरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी झाली आहे. लढाऊ कामगार नेते, प्रबोधनाचा वसा घेतलेला सच्चा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती.
- पुष्पा भावे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
’’
ज्या व्यक्ती निर्भीडपणे विचार मांडतात, त्यांच्यावरच असे भ्याड हल्ले होत असतात. मात्र, अशा हल्ल्यांना आता उत्तर देण्याची वेळ आली आहे.
- सुगंधी फ्रान्सिस, सामाजिक कार्यकर्त्या
’’
गोविंद पानसरे हे शाहू महाराजांचे खरेखुरे वारसदार होते. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर पुन्हा एकदा पोरके झाले आहे.
- भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्ते
’’
पानसरेंची हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्याची शासनाची जबाबदारी आहे.
- आनंदराज आंबेडकर, रिपाइं नेते
’’
पानसरेंच्या हत्येमागे फॅसिस्टवादी आणि जातीयवादी शक्तींचाच हात असून, त्याविरोधात आम्ही चळवळ उभी करत आहोत.
- सुधीर ढवळे, लेखक
’’ पानसरे यांच्यावर हा हल्ला नसून तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. भारतीय संविधानात बदल करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धर्मांध शक्तींचे संविधान बदलाचे हे एक पाऊल आहे. बोलती तोंडे बंद करुन विचार स्वातंत्र्य बंद होणार नाही. उलट त्याला नवनवीन घुमारे फुटतील, यातून अनेक पानसरे जन्म घेतील.
- ज. वि. पवार, साहित्यिक

 

Web Title: The grenade is spread over the Kolhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.