महामानवांनी देशाला दिशा दिली
By Admin | Updated: August 11, 2015 01:18 IST2015-08-11T01:18:16+5:302015-08-11T01:18:16+5:30
शोषित व वंचित समाजापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे; शिवाय त्यांनी
महामानवांनी देशाला दिशा दिली
नागपूर : शोषित व वंचित समाजापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे; शिवाय त्यांनी वंचित समाजाला समानतेचा अधिकार मिळवून दिला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने रविवारी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले तर, प्रमुख अतिथी म्हणून केंंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मंचावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रवीण दटके व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार व संत रविदास पुरस्काराचे विशेष संस्था व व्यक्तींना वितरण करण्यात आले.
राज्यातील वंचितांसाठी पथदर्शी काम करणाऱ्या पुरस्कारप्राप्त संस्था व व्यक्तींची जबाबदारी अधिक वाढली आहे. या संस्था व व्यक्ती समाजापुढे आदर्श ठरणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर लवकरच भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच लंडन स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अण्णा भाऊ साठे महामंडळात गैरव्यवहार करणाऱ्यांना कारागृहात पाठविणार असल्याचे दिलीप कांबळे म्हणाले.
पुरस्काराचे मानकरी
मुंबई येथील भिक्कू संघाज युनाटेड बुद्धिस्ट मिशन, सर्वोदय बुद्धविहार, डेक्कन एज्युकेशन सोसायटी - पुणे, प्रबोधिनी ट्रस्ट - नाशिक, वनवासी सेवा समिती - जामोद, विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन रिसर्च सेंटर - औरंगाबाद व कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था - नागपूर यांना शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमी -नागपूर, अण्णा भाऊ साठे ह्युमन अॅण्ड कल्चरल सोसायटी -नांदेड, जोशाबा शिक्षण प्रसारक मंडळ -नाशिक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे युवक मंडळ -कोल्हापूर व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे लोककला मंडळ -किल्लारी यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार, नांदेड येथील महाराष्ट्र चर्मकार परिषद व अवधूत को-आॅपरेटिव्ह सोसायटी यांना संत रविदास पुरस्कार देण्यात आला.
वैयक्तिक पुरस्कारामध्ये यशवंत रामचंद्र भिसे -पुणे, दत्ताबापू काळूके -बीड, लहानू नाडे -औरंगाबाद, रामचंद्रप्पा गायकवाड -उस्मानाबाद, मुक्ताबाई दुंडे -गोंदिया, बाजीराव शिंदे -पुणे, प्रभाकर शिरसाठ -मुंबई, उत्तम लहुबंदे -मुंबई, साखराबाई बगाडे -ठाणे, युवराज मगदुम -ठाणे, रमेश वैरागर -नाशिक, संभाजी कांबळे -नाशिक, श्रीकांत साठे -अहमदनगर, रामचंद्र पाखरे -जळगाव, प्रल्हाद कांबळे -पुणे, शांताराम जोगदंड -पुणे, संजय शेजवळ -औरंगाबाद, यशोदाबाई कोरडे -हिंगोली, कृष्णा वानखेडे -नागपूर, शंकर वानखेडे -नागपूर, दिगंबर घंटेवाड -नांदेड, छायाबाई घोरपडे -लातूर व वामन श्रीपद आमटे -चंद्रपूर यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच बाळकृष्ण कांबळे -ठाणे, सरोज बिचुरे -मुंबई, भरत कारंडे -पुणे, ईश्वरदास सोनवणे -भंडारा व लीलाधर कानोडे -नागपूर यांना संत रविदास पुरस्कार व मुंबई येथील नटवरलाल रघुनाथ खरे यांना कर्मवीर दादासाहेब भाऊराव गायकवाड पुरस्कार प्रदान केला.