औरंगाबादेतील धान्याचे अडत बाजार आजही बंद
By Admin | Updated: July 13, 2016 21:26 IST2016-07-13T21:26:05+5:302016-07-13T21:26:05+5:30
१४ जुलै रोजी जाधववाडीतील धान्याचे अडत व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनने दिली.

औरंगाबादेतील धान्याचे अडत बाजार आजही बंद
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 13 - धान्यावरील अडत खरेदीदाराकडून वसूल करण्यात येवू नये, ही मागणी राज्य सरकारने मान्य केली नसल्याने उद्या १४ जुलै रोजी जाधववाडीतील धान्याचे अडत व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनने दिली. मात्र, फळे व पालेभाज्यांचा अडत व्यवहार उद्यापासून पूर्ववत सुरु होणार असल्याचे फळे-भाजीपाला आडत व्यापारी संघटनेने जाहीर केले आहे.
यासंदर्भात औरंगाबाद मर्चन्टस् असोसिएशनचे सचिव दिलीप गांधी यांनी सांगितले की, मुंबईतील व्यापारी प्रतिनिधींची बुधवारी महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांच्या सोबत बैठक झाली. मात्र, या बैठकीतील अडत संदर्भात काय निर्णय घेण्यात आले हे अजूनही स्पष्ट झाले नाही. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात पुणे मर्चंट चेंबरने उद्या गुरुवारी दुपारी ३ वाजता पुण्यात बैठक बोलविली आहे. यात राज्यातील अडत संघटनेचे प्रतिनिधी हजर राहणार आहे. या बैठकीत जो निर्णय सर्वानूमते जो निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल.
औरंगाबाद फळे व भाजीपाला आडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इसा खान यांनी सांगितले की, गुरुवारपासून फळे,भाजीपालाचा अडत व्यवहार सुरु होणार आहे. अडत कोणाकडून आकारायची याचा निर्णय बाजार समितीचे सभापती व सचिव यांच्याशी चर्चा करुन घेण्यात येईल.