निर्विघ्न गणेशोत्सवासाठी शासनाने वटहुकूम काढावा
By Admin | Updated: July 5, 2015 02:08 IST2015-07-05T02:08:21+5:302015-07-05T02:08:21+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी राज्य सरकारने आता थेट वटहुकूम काढावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

निर्विघ्न गणेशोत्सवासाठी शासनाने वटहुकूम काढावा
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी राज्य सरकारने आता थेट वटहुकूम काढावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या मागणीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील पाठिंबा दर्शविला आहे. ते याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यामुळे फडणवीस सरकार न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार की मंडळांचे मन राखण्यासाठी न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसविणार; याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे
मंडळांना पाठिंंबा देत शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवादरम्यान विविध परवान्यांसाठी महापालिकेचे आणि इतर प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. यावर तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने शनिवारी सायंकाळी ६ वाजता दादरमधील शिवसेनाभवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची खंत व्यक्त केली. राज्यात पूर्वीच्या युती सरकारने वटहुकूम काढत सार्वजनिक मंडळांना दिलासा दिला होता. ही बाब समितीने उद्धव यांच्या लक्षात आणून दिली. यावर गणेशोत्सवादरम्यान वटहुकूम काढण्यात यावा म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तसे आश्वासनच त्यांनी समितीला दिले आहे. (प्रतिनिधी)
मुंबईतील गणपती, नवरात्र आणि दहीकाला उत्सव साजरे करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे उत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत भाजपाने महामंत्री सुनील राणे, आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक जनाधिकार समिती गठित केली आहे. या समितीच्या वतीने शुक्रवारी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. यावर ९ जुलै रोजी सुनावणी होईल.