आंबेडकर भवन पाडण्यास सरकार जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 05:08 IST2016-07-20T05:08:23+5:302016-07-20T05:08:23+5:30
आंबेडकर भवन रातोरात पाडण्यात माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.

आंबेडकर भवन पाडण्यास सरकार जबाबदार
मुंबई : दादर येथील आंबेडकर भवन रातोरात पाडण्यात माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी सदस्यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला.
दादर येथील आंबेडकर भवन पाडण्यात आल्याच्या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावेळी झालेल्या भाषणात जयदेव गायकवाड, जनार्दन चांदूरकर, जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, कपिल पाटील, हरिभाऊ राठोड आदी सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच आंबेडकर भवन पाडण्यात आली. तसेच ही इमारत धोकादायक ठरविणारी मुंबई महापालिकाही तितकीच जबाबदार असल्याचे गायकवाड म्हणाले. तर, आंबेडकर भवन ऐतिहासिक वास्तू होती. तिथे मुकनायक, प्रबुद्ध भारत आदी वृत्तपत्रे छापली जात. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय अशी ऐतिहासिक वास्तू पाडता येत नाही. राज्याचे माजी मुख्यसचिव आणि सध्याचे माहिती लोकायुक्त रत्नाकर गायकवाड
यांच्या पाठीमागे अदृश्य राजकीय
शक्त कार्यरत आहे. त्यामुळे आंबेडकर भवन पाडण्याचे षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप चांदूरकर यांनी केला.
या प्रश्नावरुन आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे सभागृहाचे नियमित कामकाज बाजूला सारुन या विषयावर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी केली. मंगळवारच्या दिवसभराच्या कामकाजात याच विषयावरील लक्षवेधी सूचना मांडण्यात आली असल्याचे सांगत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्थगन प्रस्ताव नाकारला. (प्रतिनिधी)
>आंबेडकर भवनप्रकरणी चौकशीचे निर्देश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दादर येथे उभारलेले भवन धोकादायक ठरवून ते पाडण्याची परवानगी कोणी दिली, नव्या इमारतीचा आरखडा कोणी मंजूर केला आणि इंटेनशन फॉर डेव्हलपमेंटला परवानगी कशी मिळाली, याची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले. विधानसभेत हा विषय बळीराम शिरसकर यांनी अनोख्या पध्दतीने उपस्थित केला. तर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार आणि आमदार भाई गिरकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले. शेलार म्हणाले,
डॉ. आंबेडकर यांच्या सर्व वास्तुंचे जनतच झाले पाहिजे अशीच भूमिका सरकार आणि भाजपाची आहे. दादर येथील या पवित्र वास्तूलाही ऐतिहासिक वारसा वास्तू म्हणून घोषित करून महापालिकेने जतन करण्याची गरज होती. पण संपूर्ण वास्तुला ३५४ ची नोटीस बजावून ती धोकादायक इमारतीच्या सी १ दर्जामध्ये टाकण्यात आली. तसेच नव्या इमातीचा आराखडा मंजूर करण्यात आला.