सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर
By Admin | Updated: November 1, 2015 00:53 IST2015-11-01T00:53:48+5:302015-11-01T00:53:48+5:30
भाजपा सरकार महाराष्ट्रात वर्षपूर्ती साजरी करत आहे, पण या काळात सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला आहे, असा आरोप ज्येष्ठ नागरिक कृती समितीसह ज्येष्ठांच्या

सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर
- नामदेव मोरे , नवी मुंबई
भाजपा सरकार महाराष्ट्रात वर्षपूर्ती साजरी करत आहे, पण या काळात सरकारला ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला आहे, असा आरोप ज्येष्ठ नागरिक कृती समितीसह ज्येष्ठांच्या महाराष्ट्र व अखिल भारतीय संघटनेने केला आहे. या संघटनेने वर्षभरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट मिळावी, यासाठी सात पत्रे दिली आहेत, परंतु पूर्ण वर्षात मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासाठी वेळच मिळू शकलेला नाही. वर्षपूर्तीच्या काळात सरकारला राज्यातील १ कोटी ११ लाख ज्येष्ठ नागरिकांचा विसर पडला असल्याचे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक एस.पी. किंजवडेकर यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे संस्थापक एस.पी. किंजवडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन, राज्यातील ज्येष्ठांच्या समस्या ऐकल्या होत्या. त्या वेळी त्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाच्या जाहीरनाम्यातही ज्येष्ठ नागरिक धोरणाचा समावेश केला होता. फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाने ७ आॅक्टोबर २०१५ रोजी त्यांना पत्र पाठवून राज्यातील ज्येष्ठ नागरिक धोरणात सुधारणा करण्यात यावी व इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ मागितली, परंतु मुख्यमंत्र्यांनी पत्राचे साधे उत्तरही दिले नाही. वारंवार भेट मिळावी, यासाठी पाठपुरावा केला, पण या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचे सौजन्यही दाखविलेले नाही.
केंद्रामध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना वृद्धाश्रम उभारण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती, परंतु अद्याप एकही वृद्धाश्रम उभा राहिला नाही. राज्य सरकारही वृद्धाश्रमांसाठी ठोस कार्यवाही करत नाही. त्यामुळे हे ‘अच्छे दिन’ आमच्यासाठी नव्हेत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.