स्वच्छ, गतिमान व विकासाकडे नेणारे सरकार - राज्यपाल
By Admin | Updated: November 12, 2014 17:13 IST2014-11-12T16:52:47+5:302014-11-12T17:13:18+5:30
राज्यात २४ तास वीज व पाणी, प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग व एक्सप्रेस वेची बांधणी असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे.

स्वच्छ, गतिमान व विकासाकडे नेणारे सरकार - राज्यपाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - राज्यात २४ तास वीज व पाणी, राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग व एक्सप्रेस वेची बांधणी, सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन, पोलिस दलाचे आधुनिकीकरण असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान शिवसेना आमदारांनी राज्यपाल चले जाव, दादागिरी नही चलेगी अशी घोषण देत विरोध दर्शवला आहे.
फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान राज्यपाल विद्यासागर राव यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. राज्यपालांनी अभिभाषण करु नये अशी मागणी करणारे पत्रच काँग्रेस आमदारांनी राज्यपालांना पाठवले. मात्र यानंतरही राज्यपाल अभिभाषणासाठी विधीमंडळात पोहोचले. यानंतर शिवसेना आमदारांनी राज्यपालांची गाडी रोखून ठेवली. सुमारे पाच ते दहा मिनीटानंतर राज्यपालांनी गर्दीतून मार्ग काढत विधीमंडळ गाठले. भाषणाच्या अखेरीस काँग्रेस आमदारांनी सभात्याग करत आपला विरोध दर्शवला.
राज्यपालांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
> महाराष्ट्रातील नवीन सरकार विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षापूर्ण करण्यासाठी कटीबद्ध
> सरकारच्या व्हिजन डॉक्यूमेंटमधील आश्वासनं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न.
> राज्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करणार
> आपले सरकार या नावाने नवीन संकेतस्थ व मोबाईल अॅप तयार करणार
> मुंबईतील अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा तर इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणार
> उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी जाचक अटी रद्द करणार
> पोलिस दलाचे आधुनिकीकरण करताना त्यांना चांगली निवासस्थान व त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यास नवीन सरकार कटीबद्ध
> सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विशेष तरतूद
> नवी मुंबईतील विमानतळाच्या कामाला वेग देणार
> सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दोन महिन्यात नवीन धोरण मांडणार
> पर्यायी व्यवस्था तयार करुन एलबीटी रद्द करणार
> जलसंधारण, सौर उर्जेला प्राधान्य
> ई टेंडरिंग सुविधा वापरण्यास प्राधान्य
> पुण्याला देशातील आयटी हब बनवणार
> मराठवाड्यात स्वीट लाइम युनिट सुरु करणार
> नागपूरमध्ये संत्र्यांवर प्रक्रिया करणारे युनिट
> दलित अत्याचार रोखण्यासाठी कठोर धोरण आणि या खटल्यांचा तातडीने निकाल लागावा यासाठी प्रयत्न करणार