रात्रभर गजबज; पण सुरक्षेचे काय?

By Admin | Updated: July 1, 2016 02:21 IST2016-07-01T02:21:57+5:302016-07-01T02:21:57+5:30

नाइटलाइफच्या निमित्ताने धनदांडग्यांची सुरू होणारी चंगळ पोलिसांसाठी मात्र डोकेदुखी ठरणारी आहे.

Good night; But what about security? | रात्रभर गजबज; पण सुरक्षेचे काय?

रात्रभर गजबज; पण सुरक्षेचे काय?


मुंबई : नाइटलाइफच्या निमित्ताने धनदांडग्यांची सुरू होणारी चंगळ पोलिसांसाठी मात्र डोकेदुखी ठरणारी आहे. रात्रीच्या वेळी महिला सुरक्षेबरोबरच, नशेबाज, गर्दुल्ले, स्मगलर यांसह कायदा व सुव्यवस्थेचा अतिरिक्त भार पोलिसांवर पडणार आहे. अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणायचे याबाबत पोलीस दलात चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई पोलीस दलातील ३५ हजार पोलिसांच्या फौजफाट्यावर मुंबईकरांची सुरक्षा आहे. मुंबईकरांना पुरेसे संरक्षण नाही. शक्ती मिल आणि इस्थर अनुह्यासारखी प्रकरणे अद्याप ताजी आहेत. मुंबईचा वाढता आवाका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा कमी पडते. रात्रीही मुंबई व्यापार-पर्यटनाच्या माध्यमातून सुरू झाल्यास त्याचा ताण नक्की येणार आहे.
मुंबईला खरोखर पाश्चिमात्य देशांमधील शहरांसारखा नाइटलाइफचा दर्जा द्यायचा असल्यास सर्वप्रथम पोलिसांचे मुबलक संख्याबळ वाढविणे, त्यांचे सक्षमीकरण, आधुनिकीकरणासाठी त्यांना पुरेशा नागरी सुविधा देणे आणि कायद्यातील शिक्षा कडक करून गुन्हेगारांच्या मनात कायद्याची जरब बसविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. या साऱ्यांचा विचार करता, नाइटलाइफआधी मुंबईकरांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आग्रह धरावा आणि मगच नाइटलाइफचा अट्टाहास करणे योग्य असल्याचे निवृत्त एसीपी वसंत ढोबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वाहतूक पोलिसांवरही ताण
या निर्णयामुळे मुंबई वाहतूक पोलिसांवर मात्र कामाचा प्रचंड ताण वाढणार असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. सध्या ३,३00 एवढे मनुष्यबळ मुंबई वाहतूक पोलिसांकडे असून, दुप्पट मनुष्यबळाची गरज असतानाही तेवढ्याच मनुष्यबळात काम करावे लागत आहे. लाखोंच्या संख्येने होत असलेल्या केसेस आणि कमी मनुष्यबळ असल्याने वाहतूक पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. नाइटलाइफला परवानगी मिळाल्याने हा ताण आणखीच वाढेल, अशी भीतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दारू पिऊन वाहन चालवणे तसेच बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना रोखण्यासाठी २00 ते २५0च्या दरम्यान वाहतूक पोलीस तैनात असतात. नाइटलाइफ सुरू झाल्यावर त्यांची संख्या अधिक वाढवावी लागेल.
‘अनेक गोष्टींची तरतूद करावी लागेल’
टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागाच्या सहायक प्राध्यापक अस्फा डोकाडिया यांनी सांगितले, नव्या निर्णयाचे स्वागत आहे. रात्री कामावरून घरी येणाऱ्या महिलांना यामुळे दिलासा मिळेल. कोणत्याही क्षणी वस्तू मिळू शकतील. असे असले तरी या नाइटलाइफसाठी अनेक गोष्टींची तरतूद करणे आवश्यक आहे. कामगारांना यासाठी विशेष ट्रेनिंगसुद्धा देणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे अनेक अडचणी सुटतील.
‘रात्रीच्या वेळी सुविधा असणे चांगले’ : सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदुगडे म्हणाले, ‘नाइटलाइफ’ या शब्दाला वेगळेच ग्लॅमर दिल्यामुळे याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मुंबई हे शहर कधीही न थांबणारे आहे. येथे हजारो कामगार काम करीत असतात. त्यांच्यासाठी रात्रीच्या वेळी सुविधा उपलब्ध असणे चांगलेच आहे. त्यामुळे या निर्णयाला पाठिंबा आहे. सर्वसामान्यांनीही या नजरेने पाहिले तर ते वावगे वाटणार नाही.

Web Title: Good night; But what about security?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.