चांगले अन्न, चांगले आरोग्य
By Admin | Updated: October 18, 2016 03:57 IST2016-10-18T03:57:33+5:302016-10-18T03:57:33+5:30
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. पूर्णब्रह्म याचा अर्थ देव, परमेश्वर. त्याचा सदैव मान ठेवला तर आपल्याला कधी अन्नाविना दिवस काढावे लागणार नाहीत.

चांगले अन्न, चांगले आरोग्य
- विजयकुमार पोंक्षे, आयुर्वेदाचार्य
अन्न हे पूर्णब्रह्म आहे. पूर्णब्रह्म याचा अर्थ देव, परमेश्वर. त्याचा सदैव मान ठेवला तर आपल्याला कधी अन्नाविना दिवस काढावे लागणार नाहीत. अन्न व आरोग्य यांची जुळ्या भावाप्रमाणे सांगड घालतात. उत्तम, सर्व दृष्टीने योग्य अन्न, म्हणजेच उत्तम आरोग्य. अन्न आणि आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू.
ऋतूप्रमाणे देशकालपरत्वे अन्नाचे नानाविध प्रकार केले जातात. भारतातील अन्नसंस्कृती, अन्नसंस्कार हे फार पुरातन आहेत. आपल्याकडील पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू, त्या काळात येणारे सण, व्रत, वैकल्ये तसेच याच कालावधीत नैसर्गिकरीत्या व मुबलक प्रमाणात मिळणारा भाजीपाला, अन्नधान्य व फळफळावळ यांची सांगड आपल्या शास्त्रात, आयुर्वेदात घालण्यात आली आहे. त्यानुसार योग्य आहार, व्यायाम, दिनचर्या ठेवल्यास चांगले आरोग्य लाभते. भारतीय खाद्यसंस्कृतीतील पदार्थ, त्यात वापरले जाणारे विविध मसाले मग अगदी कांदा-लसूण का असेना, हे घटक आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. भारतीय सण-संस्कृती आणि त्या काळात केले जाणारे पदार्थ शरीरास पोषक आहेत. उदा. संक्रांत- तीळगूळ. मकरसंक्रात थंडीत येते. तीळ आणि गूळ शरीरास उष्णता देण्याचे काम करतात. याच काळात बाजरीची भाकरी, भरली वांगी असे पदार्थ खाल्ले जातात. त्यातूनही शरीराला उष्णता, ऊर्जा मिळते.
सध्याची बदललेली दिनचर्या, धकाधकीची जीवनशैली आणि त्यानुसार बदललेल्या नाश्ता-जेवणाच्या वेळा, वाढते प्रदूषण, अस्वच्छता, उघड्यावरचं खाणं-पिणं... पाश्चिमात्य पदार्थ गोड-चविष्ट लागत असले तरी हे सर्व आरोग्याला घातक ठरत आहेत. पावाचे उदाहरण घेता येईल. बर्गर, पिझ्झा, सॅण्डविच आदी पदार्थांत मुख्य घटक म्हणून पाव किंवा तत्सम घटक वापरला जातो. मैद्यापासून पाव तयार होतो. मैदा हा मुळात पचायला जड आहे. त्यामुळेच पावासारखे घटक खाणं टाळायला हवं.असे पदार्थ खाल्लेच तर फिरण्यासारखा व्यायाम असायला हवा. नाहीतर अपचन, गॅस, शौचास त्रास आदी विकार जडतात. सध्या तासन्तास एकाच जागी बसून काम करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. साधे जेवण-आहार घेतला तरी शरीराची हालचाल होत नाही. अशा छोट्याछोट्या गोष्टी आजार बिघडण्यास कारणीभूत ठरतात. आजही जगातील सर्व माणसांना मुबलक अन्न मिळत नाही. आदिवासी, दुर्गम भागातील घटकांना रेशनवरील अन्नासाठीही झगडावे लागते. ते विचारात घेऊन अन्नाची नासाडी करू नये. ते टाळण्यासाठी सरकारने त्यासाठी दंडासारखी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. लग्न, विविध समारंभ, उपाहारगृहे, अन्नदान, मंगल कार्यालये आदी ठिकाणी त्याचे भान ठेवले पाहिजे. संपूर्ण अन्नप्रक्रियेची यंत्रणा ही समाजहितासाठीच राबवली जावी. तिला व्यापारी तत्त्वाचा वाराही लागू नये.
- शब्दांकन : आमोद काटदरे
>ऋतूंनुसार आहार व पथ्ये
पावसाळा : या ऋतूतील भूक फसवी असते. या काळात पोळी-भाकरीचे प्रमाण भोजनामध्ये कमी असावे. पर्याय म्हणून गोड व तिखट घावनाचा वापर जास्त करावा.
भोजनात कोशिंबीर प्रकारात- गाजर, बीट, मुळा-टोमॅटो, काकडी यांचा वापर दही घातल्याशिवाय जास्त करावा.
भाज्यांमध्ये गवार, भेंडी, दुधी, कोबी, शेवगा, लालभोपळा, सुरण, कच्ची हिरवी केळी, शेवग्याचा पाला, भारंगीची भाजी इत्यादी खाण्यावर भर हवा. चटणीमध्ये लसूण, आलं, पुदिना, आमचूर, डाळिंबाचे दाणे यांचा वापर जास्त करावा. पालेभाज्या खाणे टाळावे.
पचनासाठी सकाळी हिंगाष्टक चूर्ण एकदोन चमचे, लिंबाचा गोड रस व पाव कप गरम पाणी एकत्र करून द्यावे. भोजनानंतर चांगल्या प्रतीचे ८-१० मनुके खाव्यात. या ऋतूमध्ये पोटभरून जेवू नये. थोडे कमी खावे. ‘जो भुकी तो सुखी’ हे लक्षात ठेवावे.
मुंबई-ठाण्यातील हवा प्रदूषित असल्यामुळे व्हायरल आजार पसरतात. त्यासाठीही योग्य खबरदारी घ्यायला हवी.
निंबचूर्ण दिवसातून एकदोन वेळा एक ते तीन चिमूट घेतल्यास आजारपण येणार नाही. वरील पथ्यांबरोबर योगासने व श्वसनाचे व्यायाम केल्यास आरोग्य चांगले ठेवता येईल.
>शरद ऋतू : आता शरद ऋतू अर्थात आॅक्टोबर हीटला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविध सणांमुळे खाद्यपदार्थांची रेलचेल असते. मसालेदार, चविष्ट, अतितेलकट, चमचमीत पदार्थ पोटात गेल्यामुळे शरीराची आंतररचना बिघडते. त्याचा त्रास आपल्याला या ऋतूमध्ये जास्त जाणवतो. अशा वेळी आयुर्वेदात वर्णन केलेले पंचकर्मातील विरयन-वमन यांचा योग्य मार्गदर्शनाखाली उपयोग केल्यास मार्च-एप्रिलपर्यंत अत्यंत सुखाने, आनंदाने आरोग्यदायी जीवन जगता येते.
>या काळातील आहार पुढीलप्रमाणे
खाद्यपदार्थ/पेय : जुना मोरावळा, आवळा चूर्ण, गोड आवळा कॅण्डी, आवळा सरबत, कोकम सरबत, तुळशीचे बी, सब्जा बी, गुलकंद, नारळाचे पाणी, धण्याचे पाणी, बेल सरबत, सोडा लेमण वॉटर, कवठाची चटणी व बर्फी, चंदन-वाळा सरबत इत्यादी.
औषधे : सूतशेखर गोळ्या, त्रिफळा चूर्ण, चंद्रपुटो प्रवाळ भस्म, रसायन चूर्ण, आवळा व नागरमोथा चूर्ण इत्यादी.
आहाराच्या वेळा पाळणे महत्त्वाचे आहे : न्याहारीची वेळ सकाळी ८ ते ८.३०, दुपारचे जेवण १२.३० ते १.३० दरम्यान, रात्रीचे भोजन ७.३० ते ८.३० या वेळेत व्हायला हवे. रात्रीचे भोजन थोडे हलके असावे. त्यानंतर अर्धा तास फिरणे आवश्यक आहे.
हिवाळा : या ऋतूमध्ये शरीराला उष्मांकाची जास्त गरज असते. त्यामुळे अधिक भूक लागते. या काळात बाजारात चांगल्या व विविध प्रकारच्या पौष्टिक भाज्या-फळे येतात. त्या आवर्जून खाव्यात. सुकामेवा खावा. दिवाळीसारखा सण या काळात येतो.
आपण दरवर्षी आणि आता बाजारात मिळत असल्याने वर्षभर फराळ खात असलो, तरी आपल्या शरीराला त्याची सवय नसते. जेवताना पोळी-भाकरी, भाजी, वरण-आमटी, भात, चटणी असे नेहमीचेच साधे जेवण जेवावे.
फराळाचे पदार्थ खाऊ नये. अथवा, जेवणाऐवजी केवळ फराळाचे पदार्थ खावेत. त्यामुळे जुलाब, उलट्या यासारखा त्रास होणार नाही. फटाक्यांंमुळे वायुप्रदूषण होतो. त्याने घसा बसणे, खोकला याचा त्रास होतो. त्यामुळे सकाळ-सायंकाळ मिठाच्या पाण्याने वॉटर किंवा माउथ वॉशने गुळण्या कराव्यात.
बाहेरून आल्यावर डोळे उघडे ठेवून तोंड स्वच्छ धुवावे. त्यामुळे धुळीचे कण चेहऱ्यावर राहणार नाहीत. घरात फटाक्यांचा धूर होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
>उन्हाळा : उन्हाळ्यात तहान भरपूर लागते. त्यामुळे पाण्याचा घटक असलेले पदार्थ खावेत. उदा. कांदा, लाल कलिंगडाऐवजी पांढरे कलिंगड, सफरचंद, द्राक्ष, टरबूज, आंबा, जाम, फणस इत्यादींचे सेवन करावे.
कोल्ंिड्रकऐवजी ग्लुकोज, इलेक्ट्रोवॉटर, नारळपाणी, कोकम सरबत, आवळा सरबत, ताक आदी शीतपेये किंवा घरी काढलेला फळांचा रस घ्यावा. जेवणे हलके असावे. आइस्क्रीम सायंकाळच्या आत खावे. ते कधीही रात्री खाऊ नये.
गोड, आंबट, खारट हे मधुररस आहेत. ते माणसाला प्रसन्न, शांत ठेवतात. कडू, तिखट, तुरट या रसांमुळे मनोवृत्ती तापट, रागीट होते.