मराठवाड्याला पाणी देणार
By Admin | Updated: October 31, 2015 02:39 IST2015-10-31T02:39:32+5:302015-10-31T02:39:32+5:30
मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसी पाणी सोडण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला हिरवा कंदील दाखविला.
_ns.jpg)
मराठवाड्याला पाणी देणार
मुंबई : मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडी धरणामध्ये १२.८४ टीएमसी पाणी सोडण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला हिरवा कंदील दाखविला. त्याचवेळी यापुढेही जर पाणी सोडण्याची आवश्यकता वाटली, तर त्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असेही राज्य सरकारला बजावले.
राज्य जलनियामक प्राधिकरणाच्या १९ सप्टेंबर २०१४च्या आदेशानुसार गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे प्राधिकरणाने (जीएमआयडीसी) नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा आढावा घेतला. त्यानंतर जायकवाडी धरणामध्ये पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने नाशिक व नगरच्या धरणांतील १२. ८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय १७ आॅक्टोबर २०१५ रोजी घेतला. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका नाशिक व नगरच्या रहिवाशांनी उच्च न्यायालयात दाखल केल्या. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठापुढे होती.
नाशिक व नगरमध्येच पाण्याची कमतरता असून टँकरने पाणी मागवण्याची वेळ नाशिक व नगरकरांवर आली आहे. मराठवाड्याची तहान भागेल एवढे पाणी जायकवाडीमध्ये आहे. तसेच जीएमआयडीसीने नाशिक व नगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी जलनियामक प्राधिकरणाला याची माहिती दिली नसल्याने हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी नाशिक व नगरकरांनी केली होती. तसेच या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत जीएमआयडीसीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशीही अंतरिम मागणी याचिकांद्वारे करण्यात आली.
तर मराठवाड्यातील अनेक तालुक्यांत २० व ३० दिवसांनी पाणी सोडण्यात येते. जायकवाडी धरणात पुरेसे पाणी नसून सध्या उपलब्ध असलेले पाणी हा मृत पाणीसाठा आहे. पिण्यासाठी त्याचा वापर करता येणार नाही. त्यामुळे जीएमआयडीसीचा निर्णय योग्य आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील आणि मराठवाड्यातील रहिवाशांनी केला.
या याचिकांवर अंतरिम निर्णय देताना खंडपीठाने जीएमआयडीसीच्या नाशिक, नगरमधील धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला.
जलनियामक प्राधिकरणाचे एक अधिकारी गेल्या सुनावणीदरम्यान समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)
.......................
पाणी केवळ पिण्यासाठी
नाशिक व नगरच्या धरणांमधून जायकवाडी धरणामध्ये केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्यात येईल. तसेच यापुढे मराठवाड्याला नाशिक व नगरमधील धरणांमधून पाणी सोडण्याची आवश्यकता वाटली तर त्यासाठी न्यायालयाची पूर्वपरवानगी घ्यावी लागले,’ असेही खंडपीठाने राज्य सरकारला बजावले. तसेच पाणी सोडताना ते वाया जाणार नाही, याचीही काळजी घेण्यास खंडपीठाने राज्य सरकारला सांगितले.