मृतांच्या नातेवाइकांना १० लाख द्या
By Admin | Updated: July 5, 2015 02:25 IST2015-07-05T02:25:03+5:302015-07-05T02:25:03+5:30
दारूकांडातल्या मृतांच्या नातेवाइकांना सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असून ती वाढवून १० लाखांपर्यंत करावी, अशी मागणी शनिवारी मालवणी दारूकांड संघर्ष समितीने केली.

मृतांच्या नातेवाइकांना १० लाख द्या
मुंबई : दारूकांडातल्या मृतांच्या नातेवाइकांना सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असून ती वाढवून १० लाखांपर्यंत करावी, अशी मागणी शनिवारी मालवणी दारूकांड संघर्ष समितीने केली. आर्थिक मदतीसह वारसांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे इत्यादी मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवणार असल्याची भूमिकाही घेतली.
दारूकांडानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाइकांना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. दारूकांडात दगावलेल्यांपैकी बऱ्याच कुटुंबांपर्यंत मदत पोहोचलेली नाही, असे संघर्ष समितीतर्फे सांगण्यात आले. दारूकांडात दगावलेल्यांमध्ये पेंटर, बिगारी, कचरा वेचणारे आणि गटार साफ करणारे अशांचा समावेश होता. आधीच हलाखीची परिस्थिती त्यात कर्ता पुरुष गेल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. मृत्यू झालेल्यांकडे दारूडे म्हणून न पाहता मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कुटुंबाला सरकारने मदत केली पाहिजे. मृतांना किमान १० लाख तर अपंगत्व आलेल्यांना ५ लाखांची मदत जाहीर करावी, मृतांच्या वारसांना सरकारी नोकर, मोफत शिक्षण द्यावे, अशी भूमिका संघर्ष समितीचे समितीचे सदस्य नारायण खराडे यांनी
‘लोकमत’ला सांगितले.
माझे पती मुख्तार बिगारी काम करत होते. दारू सोडण्याची विनंती मी त्यांना वारंवार केली. पण त्यांनी माझे ऐकले नाही. अखेर व्हायचे तेच झाले. सरकारने मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली तर मी त्यांना खूप शिकवू शकेन. - कमरजहा,
मुख्तार शेख यांची पत्नी
माझी नातवंडे अनाथ झाली. दोन वर्षांपूर्वी सून कविता लेकरांना सोडून गेली. आता त्यांचा बापही गेला. आम्हाला अद्याप सरकार कडून मदत मिळालेली नाही. त्याचा पाठपुरावा करायलाही कोणी नाही. मी जिवंत असेपर्यंत कसाबसा मुलांचा सांभाळ करेन, पण माझ्या नंतर काय?
- शांताबाई, मृत अर्जुनची आई