शिक्षणाच्या कमी संधी मिळूनही मुलांपेक्षा मुलीच हुशार : देशमुख
By Admin | Updated: March 6, 2017 03:50 IST2017-03-06T03:50:46+5:302017-03-06T03:50:46+5:30
मुलगा-मुलगी समान असे म्हणत असलो तरी ही समानता मात्र शिक्षणात दिसत नाही.

शिक्षणाच्या कमी संधी मिळूनही मुलांपेक्षा मुलीच हुशार : देशमुख
ठाणे : मुलगा-मुलगी समान असे म्हणत असलो तरी ही समानता मात्र शिक्षणात दिसत नाही. कमी संधी मिळूनही मुली या मुलांपेक्षा हुशारच असतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५० टक्क्यांहून अधिक मुली आहेत. आता प्रशासकीय सेवेत जास्तीत जास्त मुलींनी यावे. या सेवेत त्यांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी केले.
आठव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलमनाचा समारोप सोहळा रविवारी गडकरी रंगायतन येथे पार पडला. त्यात ते बोलत होते. या सोहळ््याला संमेलनाध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, स्वागताध्यक्ष निरंजन डावखरे, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त शामसुंदर पाटील, आरटीओ जितेंद्र पाटील, डॉ. आनंद पाटील, व्हॅटचे उपायुक्त अजय वैद्य, वनाधिकारी रंगनाथ नाईकडे, वैशाली पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
राजकारणात आलेल्या मुली आणि प्रशासकीय सेवेतील महिला अधिकारी यांचे काम प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षेत पास होणारच या उद्देशाने अभ्यास केला, तर यश नक्कीच मिळेल. या क्षेत्रात समाजसेवेसाठी जाणीवपूर्वक यायला हवे. तरुणांची पिढी समाजसेवेत येत आहे आणि त्याला कौतुकाची दादही मिळत आहे, असे मार्गदर्शन देशमुख यांनी केले.
स्वागताध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी मुंबई विद्यापीठाने एमपीएससीचेही विद्यापीठ उभारावे, अशी मागणी केली होती. असे कायमस्वरुपी विद्यापीठ उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोणताही संकोच न बाळगता प्रयत्न करत राहा. सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. मेहनत करा. जीवनात यशस्वीरित्या पुढे जाताना शॉर्ट कट वापरु नका, कारण तो तुमच्या जीवनाला मारक ठरु शकतो. एकच पर्याय ठेवू नका. ध्येय हे नेहमी उंचावणारे असले पाहिजे. लक्ष्य केंद्रीत करुन ध्येय गाठा. जिल्हा प्रशासन, स्टडी सर्कल आणि समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे मिनी संमेलन ठाण्यात होत गेले, तर त्याचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होईल अशी आशा कल्याणकर यांनी व्यक्त केली. मुरबाड, शहापूर, भिवंडीतील आदिवासी मुलांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी निधीची तरतूद केली असून मार्चपासून तो मिळण्यास सुरूवात होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी दीक्षित यांनीही मार्गदर्शन केले. संतोष पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
>दहा देशांत मुंबई विद्यापीठाच्या शाखा
मुंबई विद्यापीठाला १८ जुलैला १६० वर्षे पूर्ण होत आहे. अमेरिकेसह इतर देशांत विद्यापीठाच्या दहा शाखा पब्लिक युनिव्हर्सिटी अॅक्टनुसार सुरू होत आहे. अमेरिकेत विद्यापीठाच्या शाखेला जागाही मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाची २५० एकर जागा आहे, त्यात १७ लाख चौरस फुटांवर विद्यापीठाचे बांधकाम झाले आहे. सव्वा कोटी चौरस फूट जागा शिल्लक आहे. त्यात बांधकाम करायचे असून त्याचा मास्टर प्लॅन तयार करीत आहोत. त्यासाठी तीन हजार कोटींच्या निधीची गरज असून ५०० कोटींचा निधी विद्यापीठाने तयार केला आहे. ठाणे व कळवा परिसरात १४ एकर भूखंडात स्त्रियांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
आशुतोष डुंबरे यांना
आदर्श प्रशासक पुरस्कार
आशुतोष डुंबरे यांना आदर्श प्रशासक पुरस्काराने दीक्षित यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना डुंबरे म्हणाले, पुरस्कार अनेक मिळतात; पण ते कोण देते आणि कोणाच्या हस्ते मिळतात हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील मुले स्पर्धा परीक्षेत पुढे येत आहेत हे श्रेय स्टडी सर्कलचे आहे. मनात न्यूनगंड न ठेवता या सेवेत या. लोकांची सेवा करण्याचे हे एक माध्यम आहे असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
>संमेलनाच्या ठरावातील मागण्या
लोकसेवा आयोगासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे
मुख्यमंत्र्यांच्या इंटर्नशीप योजनेत एमपीएससी-यूपीएससीच्या उत्तीर्ण- अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना घ्यावे
एमपीएससीची स्वतंत्र इमारत असावी
शासनसेवेतील बरीचशी क्लास ३ पदे ही एमपीएससीमधून भरावी.