मुलीच ठरल्या बेस्ट!
By Admin | Updated: June 18, 2014 04:20 IST2014-06-18T04:20:38+5:302014-06-18T04:20:38+5:30
बारावीपाठोपाठ यंदा दहावीच्या परीक्षेचाही विक्रमी निकाल लागला असून, मुलींनी या वर्षीही आघाडी कायम ठेवली आहे़

मुलीच ठरल्या बेस्ट!
पुणे : बारावीपाठोपाठ यंदा दहावीच्या परीक्षेचाही विक्रमी निकाल लागला असून, मुलींनी या वर्षीही आघाडी कायम ठेवली आहे़ अकोला येथील बाल शिवाजी शाळेची विद्यार्थिनी अवनी रामदास खोडकुंबे ही ४९६ (९९.२० टक्के) गुण मिळवत राज्यात पहिली आल्याचे समजते़ राज्यातील नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ८८़३२ टक्के इतका लागला आहे. ‘सर्वोत्तम पाच’ (बेस्ट आॅफ फाइव्ह) या निकषानुसार निकाल जाहीर करण्यात आला. मागील वर्षी दहावीचा निकाल ८३़४८ टक्के इतका लागला होता. त्यामुळे या वर्षीच्या निकालात ४़८४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात कोकण विभाग अव्वल क्रमांकावर असून, कोल्हापूर दुसऱ्या, पुणे तिसऱ्या तर लातूर विभाग शेवटच्या स्थानावर आहे.
राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी १ वाजेपासून आॅनलाइन निकाल पाहण्यास दिला आहे. २६ जून रोजी संबंधित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार आहेत. म्हमाणे म्हणाले, राज्यभरातून १५ लाख ४९ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख ६८ हजार ७९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यानुसार राज्याचा नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ८८़३२ टक्के असून, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी २१़३२ टक्के आहे. निकालात वर्चस्व राखणाऱ्या मुलींनी यंदाही निकालात आघाडी कायम ठेवली आहे़ दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या नियमित मुलांची संख्या ७ लाख ३२ हजार २१८ (८६़४७ टक्के) असून, मुलींची संख्या ६ लाख ३६ हजार ५७८ (९०़५५ टक्के) आहे. मागील वर्षी मुलांच्या व मुलींच्या निकालामध्ये सुमारे दोन टक्क्यांचा फरक होता. यंदा हा फरक चार टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (प्रतिनिधी)