येरवड्याच्या चौकात लघुशंका करत हटकणाऱ्यांना अश्लिल हावभाव करणाऱ्या गौरव आहुजाने साताऱ्यात कराडमध्ये जात पोलिसांना सरेंडर केले आहे. यात त्याने शिंदे साहेबांची माफी मागितली आहे, हा शिंदे कोण असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच आहुजाने सकाळी दारु प्यायली होती, मग रात्री उशिरा सरेंडर का केले? दारुचा अंमल नष्ट करण्यासाठी हे केले असल्याचे आरोप होत आहेत. अशातच सर्व माध्यमांचे आहुजाकडे लक्ष असताना ही जेव्हा घटना घडली तेव्हा गाडीत दारुची बाटली घेऊन बसणारा त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला पोलीस ठाण्यात खाण्यासाठी त्याच्या मित्रांनी बर्गर, कोल्ड कॉफीचे पार्सल आणल्याचे समोर आले आहे.
बिल्डर बाळाला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तेव्हा त्याची दारू शोषून घेण्यासाठी त्याला बर्गर खायला दिला होता. आताही भाग्येश ओसवाल याला वाचविण्यासाठी व खायला देण्यासाठी पोलीस ठाण्यात त्याचे मित्र बर्गर आणि कोल्ड कॉफी घेऊन आले होते. माध्यमांचे कॅमेऱ्यांसमोर पोलिसांनी या मित्राला पोलीस ठाण्याच्या आवारातून जाण्यास सांगितले. भाग्येश याला रात्री पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्यांच्यासाठी एका बॉक्स मध्ये खाण्यासाठी पार्सल मागवले होते. त्या बॉक्समध्ये कोल्ड कॉफी ,बर्गर, कोल्ड्रिंक्स घेऊन ते आले होते. तिघांना हाकलल्यानंतर आणखी एकाने मागाहून येत पोलीस ठाण्यात जाण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यालाही पोलिसांनी तेथून जाण्यास सांगितले.
बिल्डर बाळाचे प्रकरण आठवले...
काही महिन्यांपूर्वी बिल्डर बाळाने जेव्हा मध्यरात्री रस्त्यावर उत्पात माजविलेला तेव्हा त्याला मद्यधुंद असल्यापासून वाचविण्यासाठी पोलीस ठाण्यात मागच्या बाजुला बर्गर खायला दिला होता. त्याच्या शरीरातील दारू शोषली जाऊन तो दारुच्या अंमलात आहे असा रिपोर्ट येऊ नये म्हणून हे सर्व केले गेले होते. तसेच त्यानंतर त्याचे नमुनेही बदलले गेले होते. यात त्या बिल्डर बाळाच्या आईला अटक करण्यात आली होती.
गौरव आहुजा साताऱ्यात का सरेंडर झाला...
गौरव आहुजा पोलिसांना तोपर्यंत शरण जाणार नाही जोपर्यंत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण पूर्णतः नाहीसे होत नाही, असे आपचे नेते व या प्रकरणात उघडपणे बोलणारे विजय कुंभार यांनी म्हटले होते. कारमध्ये त्याच्यासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल देखील होता, त्याच्या हातात दारुची बाटली दिसत आहे. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि आहुजा हा गाडीही चालवत होता. तरीही या दोघांचा मेडिकल रिपोर्ट खूप महत्वाचा आहे. यात जर आहुजा मद्यधुंद होता हे सिद्ध झाले नाही तर त्याला मोठा फायदा मिळू शकतो. यामुळे त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न झाले असावेत अशी शंका आता पुणेकरांना येत आहे.