Congress Harshwardhan Sapkal: आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० साली दांडी मार्च काढून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले होते, त्याची प्रेरणा घेऊन जनतेने आज आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, देशात स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना महायुद्धाला सामोरे जावे लागले, स्वातंत्र्यानंतरही जगाच्या अनेक भागात अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले, पण त्यावेळी काँग्रेस सरकारने, तत्कालीन पंतप्रधान यांनी राष्ट्र म्हणून सर्वांशी संवाद साधत ठोस धोरण, योग्य नियोजन यामुळे गॅस वा इंधनाच्या तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही. पण भाजपा सरकारकडे अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतेही धोरण नाही, संवाद नाही, सरकारने सर्व घटकांशी संवाद साधून त्यातून मार्ग काढला पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
त्यांची मानसिकता बहुजनविरोधी आहे
माझ्यावर फडणवीस व भाजपाचे नेते अत्यंत खालच्या पातळीवरची टिका करतात त्याचे आश्चर्य वाटत नाही. कारण फडणवीस व भाजपा विचार हा बहुजनांचे हक्क नाकारणारा आहे. हजारो वर्षापासूनचा हा संघर्ष आहे, त्यांची मानसिकता बहुजनविरोधी आहे. याच विचाराचा सामना आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही करावा लागला, मी तर पामर आहे. त्र्यंबकेश्वरच्या भूमीतून मी फडणवीस यांच्यासाठी परमेश्वराकडे सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या दोन ओळी सांगतो की, छोटे दिल से कोई बडा नही होता, तुटे दिल से कोई खडा नही होता. विधान भवनात बॉम्ब असल्याचा ई मेल आला हे ऐकून राज्यातील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे याचा प्रत्यय येतो. विधान भवन जर सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित करत पोलीस सध्या खलाचे रक्षण करत आहेत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दरम्यान, सरकारने अचानक गॅसच्या किमती वाढवल्या व दुसरीकडे युद्धामुळे गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने वाढवलेले गॅस दर तात्काळ रद्द करावे व गॅस सिलेंडर सहजपणे उपलब्ध होतील यासाठी उपाय योजना कराव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन केले.