गणेशोत्सवाला ‘द्विअर्थी’ गाण्यांचे लागतंय गालबोट

By Admin | Updated: September 6, 2016 00:47 IST2016-09-06T00:47:20+5:302016-09-06T00:47:20+5:30

तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटायं लागलं’, ‘बंबू दालके बारीक कुटना, देर रात को आनंद लुटला’, बघ बघ अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय,

Ganeshotsav's 'Dwisharthi' singing cost is a boon | गणेशोत्सवाला ‘द्विअर्थी’ गाण्यांचे लागतंय गालबोट

गणेशोत्सवाला ‘द्विअर्थी’ गाण्यांचे लागतंय गालबोट


पुणे : तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटायं लागलं’, ‘बंबू दालके बारीक कुटना, देर रात को आनंद लुटला’, बघ बघ अगं सखे कसं गुबूगुबू वाजतंय, तुझा झगा ग झगा ग वाऱ्यावर उडतोय, ‘पप्पी दे पप्पी दे पारोला’ यांसारख्या द्विअर्थी गाण्यांच्या सादरीकरणामुळे गणेशोत्सवाचे वातावरण गढूळ होत असून, उत्सवाला एकप्रकारे गालबोट लागतंय! महिलांना मात्र डीजेच्या दणदणाटात ही गाणी ऐकताना खूपच लाजिरवाणे वाटते; मात्र ऐकण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु त्याची तमा न बाळगता उत्सवाच्या दहा दिवसांसह मिरवणुकीच्या काळात डिजेंच्या माध्यमातून ही गाणी लावून उत्सवाच्या पावित्र्याचा भंग करीत आहेत. या गाण्यांवर कुठलीही ‘सेन्सॉरशीप’ नाही.
गणेशोत्सव म्हटला, की कार्यकर्त्यांच्या उत्साहाला एकप्रकारे उधाणच येते, उत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात आणि मिरवणुकीमध्ये भाविकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिजेच्या माध्यमातून वेगवेगळी गाणी लावण्यावर मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून भर दिला जातो. द्विअर्थी गाण्यांचाच यात अधिक भरणा असतो, या गाण्यांची वाढती क्रेझ लक्षात घेता उत्सवाच्या काही महिने अगोदर अशा गाण्यांच्या सीडी बाजारात येऊ लागतात, गणेशोत्सवात ही गाणी हमखास वाजणारच, याची खात्री असल्यानेच अशा गाण्यांची बाजारपेठ विकसित झाली आहे. डिजेंना अशी गाणी लावण्याची खास फर्माईश कार्यकर्त्यांकडून केली जाते. उत्सवाच्या काळात अशी गाणी वाजवून रस्त्यावर नृत्यातून धांगडधिंगा करण्याचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, अशा गाण्यांमुळे उत्सवाच्या पावित्र्याचा भंग होत आहे, याचे भानही राहिलेले नाही. एकदा ही गाणी वाजायला लागली की ती ऐकण्याशिवाय भाविकांना गत्यंतरच नसते. महिलांना तर त्या गाण्याचे शब्द ऐकून मेल्याहून मेल्यासारखे होते. अशा गाण्यांवर ‘सेन्सॉरशीप’चे बंधन असणे गरजेचे आहे; मात्र या गाण्यांसाठी सेन्सॉरशीपची चौकटीच निर्माण केली नसल्यामुळे गीतकार आणि म्युझिक कंपन्यांचे चांगलेच फावले आहे.
>गणेशोत्सवामध्ये द्विअर्थी गाणी वाजावीत किंवा नाहीत, याबाबत विशिष्ट मत असण्याचे कारण नाही. शुद्धीत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अशी गाणी आवडणारच नाहीत. गर्दी एकत्र जमली की मेंदू राहत नाही. सध्या गणेशोत्सवातील सेलिब्रेशनची व्याख्याच बदलली आहे. गणेशोत्सवामध्ये थिरकता यावे, अशी चांगली गाणीही उपलब्ध आहेत याचा विचारच केला जात नाही. शुद्धीवर राहणाऱ्यांची संख्या वाढली की अशी गाणी आपोआप बंद होतील.
- सलील कुलकर्णी, संगीतकार
>चित्रपट आणि जाहिरातीसाठी ‘सेन्सॉर’ आहे. मात्र, खासगी अल्बमधील गाण्यांना सेन्सॉर नाही. ती गाणी व्हिडिओमध्ये येत नाहीत, तोवर कुणीच काही करू शकत नाही. विविध मालिका, यूट्यूबसारखी अनेक नवीन माध्यमे समोर आली आहेत. परंतु सिनेमॅटोग्राफी अ‍ॅक्ट १९५२ मध्ये अजूनही नवीन माध्यमांचा समावेश झालेला नाही. या कायद्यात दुरूस्ती करून सर्व गोष्टी एकाच छताखाली आणणे गरजेचे आहे.- सुनील महाजन, माजी सदस्य, सेन्सॉर बोर्ड

Web Title: Ganeshotsav's 'Dwisharthi' singing cost is a boon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.