आडनावाप्रमाणेच परिस्थितीवर मात करणारा गजानन
By Admin | Updated: August 17, 2014 00:43 IST2014-08-17T00:43:37+5:302014-08-17T00:43:37+5:30
त्याच्या हाताला बोटे नसली तरीही त्याचे हस्ताक्षर मात्र सुदृढांना लाजविणारे आहे. पायालाही केवळ ‘टाचा’च आहेत; पण तरीदेखील तो स्वत:ची संपूर्ण कामे स्वत: करतो़ तो कुणावर ओझे नसला तरी नियतीपुढे हतबल आहे.

आडनावाप्रमाणेच परिस्थितीवर मात करणारा गजानन
जन्मत:च अपंगत्व : इच्छाशक्ती असताना परिस्थितीने हतबल; काम मिळत नसल्याची खंत
किशोर तेलंग- तळेगाव (टा़) वर्धा
त्याच्या हाताला बोटे नसली तरीही त्याचे हस्ताक्षर मात्र सुदृढांना लाजविणारे आहे. पायालाही केवळ ‘टाचा’च आहेत; पण तरीदेखील तो स्वत:ची संपूर्ण कामे स्वत: करतो़ तो कुणावर ओझे नसला तरी नियतीपुढे हतबल आहे.
कॅरम खेळात उत्कृष्ट खेळाडू आणि त्याचे सुंदर हस्ताक्षर असतानाही त्याच्या शारीरिक व्यंगाकडे पाहून कुणीही काम द्यायला तयार नाही, ही त्याची व्यथा आहे.
तो आता ३५ वर्षांचा झाला आहे. त्याचे नाव गजानन शंकर मातकर असे आहे. जन्मत:च त्याच्या हाताला बोटेच नव्हे तर पंजाही नाही. पायालाही बोटे नाहीत. पण दुर्दम्य आत्मविश्वास आणि ध्येयाने तो परिस्थितीशी लढतो आहे़ गजानन मूळचा देवळी येथील रहिवासी! तो तळेगावनजीकच्या धोत्रा कासार येथे आई-वडिलांसोबत १५ वर्षांपासून राहतो. तीन एकर शेतावर राबून आई-वडील गजाननचा सांभाळ करतात. त्यांची आणखी तीन मोठी मुलेदेवळी येथे वास्तव्यास आहेत. गजानन मार्च-१९९८ मध्ये बारावी उत्तीर्ण झाला. पुढे शिकण्याची इच्छा असताना परिस्थितीमुळे तो शिकू शकला नाही़
आर्थिक परिस्थिती बेताची आणि काम कुणी देत नसल्याने तो हताश झाला; पण मनाने खचला नाही़ दोन्ही मनगटांमध्ये पेन धरून तो कागदावर सुंदर हस्ताक्षर उतरवितो़ जेवण करतानाही त्याला कुणाच्या मदतीच्या गरज नाही़
पाय नसले तरी कुणाच्या आधाराची गरज नाही़ एखाद्या संस्थेत कारकुनाची नोकरी मिळावी म्हणून त्याने पुढाऱ्यांच्या भेटी घेतल्या; पण उपयोग झाला नाही. त्यामुळे आपणही चार पैसे कमवावेत, ही त्याची इच्छा अर्धवटच आहे़
त्याला शेतीची कामे करता येत नसल्यामुळे तो अन्य कामाच्या शोधात असतो़ सर्व अवयव व्यवस्थित असताना अनेकांना जे जमत नाही, ते तो करतो़ पडेल ते काम करायचे; पण कुणाकडे भीग मागायची नाही, असा निश्चय त्याने केला आहे़
तो उत्कृष्ट कॅरम खेळतो. वाचनाची प्रचंड आवड आहे. शासनाने या होतकरू तरुणाची दखल घेतली तर त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकेल़
आडनावाप्रमाणे अनेक अडचणींवर मात करीत गजानन जीवन जगत असला तरी संघर्षाला स्थैर्य मिळणे गरजेचे आहे़