निवडणुकीत आघाडी ?

By Admin | Updated: June 30, 2016 03:09 IST2016-06-30T03:09:40+5:302016-06-30T03:09:40+5:30

काँग्रेससोबत आघाडी करणे हिताचे ठरणार असून त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेणार

Front of elections? | निवडणुकीत आघाडी ?

निवडणुकीत आघाडी ?


ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचे पॅनल होत असल्याने काँग्रेससोबत आघाडी करणे हिताचे ठरणार असून त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. आघाडीसाठी सध्या काही स्थानिक मंडळी तयार नसली तरीदेखील राणेंच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी आघाडीसाठी हात पुढे करील, असे संकेत त्यांनी ‘लोकमत’ला दिले.
जेमतेम सहा महिन्यांवर येऊ घातलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रवादीत कशा पद्धतीने बदल केले जातील, आघाडी होईल अथवा नाही, रणनीती कशी असेल, सोशल मीडियाचा वापर कसा केला जाईल, अशा काही महत्त्वाच्या विषयांवर परांजपे यांनी माहिती दिली. मागील महिन्यात झालेल्या परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहिली होती. तसेच मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीपासून वेगळी चूल मांडण्याची तयारी काँग्रेसने सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्याबाबत परांजपे यांना छेडले असता त्यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीत आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. त्यानुसार, पुढील आठवड्यातच यासंदर्भात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काहीसे वेगळे वातावरण होते, त्यामुळे दोघांनीही स्वतंत्र निवडणूक लढवली होती. परंतु, आता शिवसेना आणि भाजपाला शह द्यायचा असेल आणि पॅनल पद्धतीत तग धरून राहायचे असेल तर आघाडी करावीच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे राणे यांच्यावर ज्या वेळेस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली, त्याच वेळेस त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यासंदर्भातील सूतोवाचही केले होते. त्यानुसार, आता राष्ट्रवादीनेदेखील आघाडीबाबत चाचपणी सुरू केल्याचे परांजपे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)
>नाराजांची मनधरणी करणार; पक्ष एकसंध
पक्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी जे नाराज झाले असतील, त्या सर्वांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचे कामही केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक नगरसेवकाच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली जात आहे. याशिवाय, यापूर्वी सोशल मीडियाच्या जबाबदारीचा अनभुव असल्याने आगामी निवडणुकीतदेखील याचा वापर करून राष्ट्रवादीला एकसंध ठेवले जाईल आणि विकासकामांचा अजेंडा ठाणेकरांपुढे नेला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Front of elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.