पदरगडच्या झऱ्यांनी घेतला मोकळा श्वास
By Admin | Updated: July 5, 2015 01:59 IST2015-07-05T01:59:10+5:302015-07-05T01:59:10+5:30
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील शेकडो गडकोटांची दुरवस्था सुरू असताना मुंबईकर ‘गिरीमित्र प्रतिष्ठान’च्या १० शिलेदारांनी कर्जतच्या पदरगडावरील शिवकालीन जीर्ण

पदरगडच्या झऱ्यांनी घेतला मोकळा श्वास
अजय महाडीक , मुंबई
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील शेकडो गडकोटांची दुरवस्था सुरू असताना मुंबईकर ‘गिरीमित्र प्रतिष्ठान’च्या १० शिलेदारांनी कर्जतच्या पदरगडावरील शिवकालीन जीर्ण विहिरींचा जीर्णोद्धार केला. विशेष म्हणजे अस्सल मुंबईकर चाकरमानी असताना स्वत:चे बिझी शेड्युल बाजूला ठेऊन त्यांनी किल्ले संवर्धनाची ही मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांच्या मिशनमध्ये त्यांनी शिडीघाटातील गंजून मोडकळीस आलेली शिडी दुरुस्त केल्याने पर्यटकांची माठी अडचण दूर झाली आहे.
सुटीच्या निमित्ताने उन्हाळ्यात व दिवाळीच्या सुटीत हजारो शिवपे्रमी व पर्यटक इकडे येतात. मात्र वर पाणी नसल्याने ते कासावीस होतात. गडाच्या मध्यावर विहीर आहे. मात्र पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, फास्टफूडची पाकिटे, बीअरच्या बाटल्या आदी कचऱ्यामुळे तिला पाणवठ्याऐवजी उकिरड्याचे स्वरूप आले आहे.
दोन दिवसांच्या खडतर परिश्रमातून या नऊ गिरीमित्रांनी येथील किल्लेप्रेमींच्या पर्यटनातील मोठा अडथळा दूर केला आहे. ‘गिरीदुर्ग संवर्धननायच् समर्पितम’ या ध्येयाने प्रेरित होऊन ‘गिरीमित्र प्रतिष्ठान, मुंबई’ ही संघटना गेली ११ वर्षे किल्ले संवर्धनाचे काम करीत आहे. बदलापूरच्या किल्ले चंदेरी, कर्जतजवळचा ढाका किल्ला या ठिकाणी प्रतिष्ठानचे अनेक वर्षांपासून कार्य सुरू आहे.
यावर्षी मे महिन्यात इतिहास अभ्यासक भगवान चिले यांच्यासह मंगेश कोयंडे, दीपा कोळवणकर,चंद्रशेखर पाटील, अमोल मोरे, सतीश झंझाड, बबन कुरतडकर, रूपेश पालवे, शैलेंद्र धुरी, संदीप भिसे आणि अनिरुद्ध कुरतडकर हे गिरीमित्र कर्जतजवळच्या भीमाशंकरच्या वाटेवरील पदरगडच्या किल्ल्यावर अभ्यासासाठी गेले होते. खाडस गाव सोडल्यावर अगदी पदरगडावर जाईपर्यंत त्यांना पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवले. या अनुभवातूनच या गिरीमित्रांना गडावर पाणी असावे, ही प्रेरणा मिळाली.
अशी आखली योजना...
१ पदरगडचा अभ्यास करताना त्यांना गडाच्या मध्यावर एक शिवकालीन विहीर दिसली. पण ती अतिशय भग्न अवस्थेत व पर्यटकांनी केलेल्या कचऱ्याने बुजलेली होती. गिरीमित्रच्या शिलेदारांनी १६ व १७ जून २०१५ रोजी येथे श्रमदान करायचे ठरविले.
२ मोहिमेसाठी १० सदस्यांनी १६ तारखेला कर्जत कोठीवडी गाठत शिडीघाटामार्गे पदरगड वाडीत पोचले. तेथे तुकाराम कुदळे या ग्रामस्थांनी कुदळ, फावडे, लोखंडी शिडीसारखे साहित्य गिरीमित्रांना पुरवले. या साहित्याचा वापर करून विहीर साडेचार फूट खोदण्यात आली.
३ या शिवकालीन विहिरीतून सुरुवातीला घाण पाणी, पालापाचोळा काढण्यात आला. विहीर साफ करताना प्लास्टिक व काचेच्या पिशव्या, बीअरचे कॅन, प्लास्टिकच्या पिशव्या व रॅफर काढण्यात आले. तब्बल १५० बादल्या चिखल व ७० बादल्या घाण पाणी काढल्यानंतर कातळ दिसू लागले. बुजलेले झरेही खळखळू लागले.
आणखीही खूप करण्यासारखे...
आता पावसाची रिपरिपही छान सुरू
झाल्याने विहिरीत पाणी भरले आहे. रानात जाणाऱ्या गावकऱ्यांनाही येथे तहान भागवता येते आहे. पुढच्या मोहिमेमध्ये गिरीमित्र गडाच्या वाटेवर दिशादर्शक फलक लावणार आहेत.
गडावरील गुहा मुक्कमयोग्य बनविणे, अवघड मार्गावर बोल्टिंग करून रोप बसविणे, किल्ल्याच्या इतिहासाचा मागोवा घेणे अशी अनेक कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. ही मोहीम गिरीमित्रांच्या मदतीने आॅगस्ट महिन्यात राबविण्यात येणार असल्याचे मंगेश कोयंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.