मराठवाड्यात चार शेतकऱ्यांची आत्महत्या
By Admin | Updated: October 3, 2015 03:44 IST2015-10-03T03:44:07+5:302015-10-03T03:44:07+5:30
सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

मराठवाड्यात चार शेतकऱ्यांची आत्महत्या
औरंगाबाद : सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद, बीड व नांदेड जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
गेवराई (जि. बीड) तालुक्यातील भोजगाव येथील भागवत भगवान काळे (४५) या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला शुक्रवारी सकाळी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे ३ एकर कोरडवाहू शेती आहे. काळे यांच्याकडे सोसायटीचे कर्ज व खासगी देणे असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले. गेवराई(जि. बीड) शहरातील गौतम घनश्याम सुतार (रा. संघमित्र नगर, गेवराई) या अपंग शेतकऱ्याने मन्यारवाडी शिवारातील स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
तळणी (ता़ हदगाव, जि. नांदेड) येथील रंगराव काशीबा शिरडकर (५५) या शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून १ आॅक्टोबर रोजी गळफास लावून आत्महत्या केली. चापानेर (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील बालू किसन थोरात (५७) या शेतकऱ्याने सततच्या दुष्काळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दुष्काळामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या घरातील मंडळींनी सांगितले.