कोकण उपायुक्तांना चार दिवसांची कोठडी
By Admin | Updated: May 25, 2014 05:37 IST2014-05-25T05:37:38+5:302014-05-25T05:37:38+5:30
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोकण आयुक्तालयातील प्रशासन उपायुक्त भाऊसाहेब पाटील यांना आज ठाणे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले

कोकण उपायुक्तांना चार दिवसांची कोठडी
नवी मुंबई : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोकण आयुक्तालयातील प्रशासन उपायुक्त भाऊसाहेब पाटील यांना आज ठाणे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले भाऊसाहेब पाटील (वय ५७) १९८३पासून शासकीय सेवेत आहेत. ठाणेमध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाने डिसेंबर २०११पासून या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. चौकशीमध्ये तब्बल ११ कोटी ३४ लाख ६८ हजार ६० रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्यामुळे त्यांच्याविरोधात शुक्रवारी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आज ठाणेमधील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत विभागाची या वर्षातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. या विभागातील अधिकार्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, पाटील यांनी नोकरीमध्ये लागल्यापासून उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती मिळवली आहे. पत्नी अर्चना व स्वत: पाटील यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये ३ सदनिका, १ गोडाऊन, ५ ठिकाणी बागायती जमीन, रोख व इतर संपत्तीचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. या जमिनी सोलापूर जिल्ह्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)