‘प्रोबेस’चा ढिगारा उपसला

By Admin | Updated: May 30, 2016 04:16 IST2016-05-30T04:16:25+5:302016-05-30T04:16:25+5:30

मिथेनॉलसह अल्कोहोलने भरलेले १५ बॅरल तळोजा येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने वायुगळती होण्याचा धोका टळला.

The foundation of 'probes' | ‘प्रोबेस’चा ढिगारा उपसला

‘प्रोबेस’चा ढिगारा उपसला


डोंबिवली : प्रोबेस कंपनीतील रिअ‍ॅक्टर स्फोटानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेले मिथेनॉलसह अल्कोहोलने भरलेले १५ बॅरल तळोजा येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने वायुगळती होण्याचा धोका टळला. येथील मातीचे ढिगारे उपसण्याचे काम रविवारी संपल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.
रविवारी पहाटेपर्यंत घटनास्थळावरील पोकलेन, जेसीबीसह सर्व साधनसामग्री-अधिकारी, कर्मचारी परतले. त्यामुळे आता केवळ निवडक पोलीस, अग्निशमन दलाचे पथक तैनात केलेले आहे.
स्फोटात जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून गेले दोन-तीन दिवस अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना सर्वसाधारण वॉर्डात हलवले आहे. त्यामुळे आता कुणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी स्मिता रोडे यांनी दिली.
प्रोबेस कंपनीशेजारील केमिकल कंपन्यावगळता अन्य कंपन्यांचे कामकाज रविवारपासून सुरू झाले. ज्या कंपन्यांचे खूप नुकसान झाले आहे, तेथील कामगार तुटलेले पत्रे, खुर्च्या, टेबल, पंखे, संगणक, फ्रीज हे सामान गोळा करीत होते. आणखी तीन-चार दिवस हे काम सुरू राहणार आहे.
कंपन्यांमधील कामगारांखेरीज अन्य कोणालाही त्या ठिकाणी
प्रवेश देण्यात येत नव्हता. कुतूहलापोटी येणाऱ्यांना पोलीस मज्जाव करीत होते. पंचनामा करण्यासाठी नेमलेल्या चार-पाच पथकांनी तीन दिवसांनी सुटी घेतल्याने रविवारी पंचनामा कक्षात माहिती संकलनाचे काम सुरू होते.
दुपारी साडेतीनपर्यंत ११ जणांचा पंचनामा केला गेला. घटनेपासून तीन दिवस घर बंद ठेवून ते बाहेर गेले
होते. आवश्यकता असल्यास सोमवार-मंगळवारी आणखी काही पंचनामे करू, असे कक्षाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी गेले तीन
दिवस ५०० मीटर परिसरातील रहिवाशांना घरे सोडून जाण्यास सांगितले होते. रविवारी प्रथमच
ते दिवसभर घरी होते. दिवसभर
घराची आवराआवर केली. स्फोटाने उद्ध्वस्त झालेले संसार पाहून
अनेक गृहिणींच्या डोळ्यांत अश्रू
उभे राहिले.
>चोरीच्या चर्चेला उधाण
स्फोटानंतर भयभीत रहिवासी घराबाहेर पडले, तेव्हा किमान १५ ते २० घरांतील मुद्देमाल चोरीस गेल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.
काही वाहिन्यांवरही तशी वृत्ते झळकली. मात्र, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांनी त्यास दुजोरा दिला नाही.
घटनास्थळी असलेली रसायने हलवल्यामुळे धोका पूर्णपणे टळला आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून अग्निशमन दल व महापालिकेचे पथक तैनात केले आहे. मात्र, नागरिकांनी सतर्क राहावे व काही शंका असल्यास मदत कक्षाशी संपर्क साधावा.
- प्रसाद उकर्डे, प्रांताधिकारी

Web Title: The foundation of 'probes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.