वनसमित्या करणार वनक्षेत्राचे संरक्षण
By Admin | Updated: September 4, 2015 22:53 IST2015-09-04T22:53:50+5:302015-09-04T22:53:50+5:30
राज्यात १२ हजार संयुक्त वनसंरक्षण समित्या स्थापन.

वनसमित्या करणार वनक्षेत्राचे संरक्षण
बुलडाणा : राज्यभरात वनालगत असलेल्या १५ हजार ५00 गावांमध्ये आतापर्यंत एकूण १२ हजार ५६१ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या (वनसंरक्षक) स्थापन करण्यात आल्या आहेत. वन विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ४५ टक्के वनक्षेत्रात या संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून संरक्षणाची कामे केली जाणार आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण करून वनांचे व्यवस्थापन व वनविकासाच्या कामांत अधिकाधिक लोकांचा सहभाग मिळावा, यासाठी वनालगत राहणार्या लोकांना विशेष सवलतीच्या दरात स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी २0१४-१५ मध्ये एकूण १९ कोटी २0 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. या अनुदानातून एकूण २८ हजार ९८५ लोकांना लाभ मिळाला. संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून वनसंरक्षण व संवर्धनाच्या कामात ग्रामस्थांचा अधिकाधिक सहभाग प्राप्त व्हावा आणि समित्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन समित्यांना चांगली कामे करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. उल्लेखनीय काम करणार्या वनव्यवस्थापन समित्यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचे कौतुक करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
*रोजगार हमी योजनेत यंत्रणा म्हणून मान्यता
वनक्षेत्रातील वृक्षतोड कमी व्हावी, यासाठी राज्य शासनातर्फे जंगलाशेजारच्या गावांमध्ये एलपीजी गॅस, बायोगॅस व दुभती जनावरे वाटप केली जात आहेत. संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करुन त्यांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत यंत्रणा म्हणून मान्यताही देण्यात आली आहे