पोलीस भरतीत उष्माघाताने पाच तरुणींना चक्कर

By Admin | Updated: May 1, 2016 01:37 IST2016-05-01T01:37:59+5:302016-05-01T01:37:59+5:30

महानगरातील वाढत्या उष्म्याचा फटका शनिवारी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी आलेल्या पाच तरुणींना बसला. कांजूरमार्ग महामार्गावर ८०० मीटर धावण्याची चाचणी सुरू

Five youths face dizziness in police recruitment | पोलीस भरतीत उष्माघाताने पाच तरुणींना चक्कर

पोलीस भरतीत उष्माघाताने पाच तरुणींना चक्कर

मुंबई : महानगरातील वाढत्या उष्म्याचा फटका शनिवारी मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी आलेल्या पाच तरुणींना बसला. कांजूरमार्ग महामार्गावर ८०० मीटर धावण्याची चाचणी सुरू असताना थकव्यामुळे त्या चक्कर येऊन पडल्या. आकस्मिकपणे घडलेल्या या घटनेमुळे भरतीच्या केंद्रावर एकच खळबळ उडाली. मात्र त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार केल्याने पुढील अनर्थ टळला.
प्रतिभा वाळवे (वय २१, रा. दहिसर), मनीषा मुंडे (२२, रा. लातूर), सरिता काळे (२३, रा. लालबाग), रेणुका गायकवाड (२२, रा. अहमदनगर) व गीता घोडके (२४ रा. दिवा, ठाणे) अशी त्यांची नावे असून प्राथमिक उपचारानंतर दुपारी सर्वांना रुग्णालयातून सोडण्यात आले. मुंबई पोलीस दलातील १२७५ पदांसाठी गेल्या दीड महिन्यापासून भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. गुरुवारी पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी संपल्याने शुक्रवारपासून महिलांंची मैदानी चाचणी घेतली जात आहे. त्यांच्यासाठी ८०० मीटर धावण्याची चाचणी असून घाटकोपर महामार्गालगत पोलीस भरती चाचणी सुरू आहे. आज सकाळपासून चाचणी सुरू होती. तरुणींची टप्प्याटप्प्याने धावण्याची चाचणी सुरू होती. नियोजित मार्गावर धावत असलेल्या
पाच तरुणींना उन्हाचा तडाखा सहन झाला नाही. प्रचंड थकवा आल्याने त्या अचानकपणे रस्त्यावर कोसळल्या. या ठिकाणी असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी चार जणांचा बळी
पोलीस भरतीत दोन वर्षांपूर्वी धावण्याच्या चाचणीमध्ये थकव्यामुळे चार उमेदवारांचा मृत्यू झाला. त्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये धावण्याचे अंतर कमी केले गेले. मात्र उष्म्यामुळे आजही तरुणींना धावताना चक्कर आल्याने दोन वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा मिळाला.

Web Title: Five youths face dizziness in police recruitment