शिकाऱ्यांना पाच वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: June 19, 2014 00:53 IST2014-06-19T00:53:36+5:302014-06-19T00:53:36+5:30
मेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकारप्रकरणीचा विदर्भातील पहिला निकाल येथील न्यायालयाने आज बुधवारी दिला. यात तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली

शिकाऱ्यांना पाच वर्षे सक्तमजुरी
वाघिणीची शिकार: विदर्भातील प्रकरणाचा पहिला निकाल
नरेंद्र जावरे - अमरावती
मेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकारप्रकरणीचा विदर्भातील पहिला निकाल येथील न्यायालयाने आज बुधवारी दिला. यात तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली तर पुराव्याअभावी चौघांची निर्दोष सुटका करण्यात आली.
मधुसिंग लहेरसिंग राठोड (३५), चिंतराम लहेरसिंग राठोड (४०), विनोद प्रेमलाल पवार (३० सर्व रा. सिनबन) असे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत. पुराव्याअभावी सागरलाल पवार, नरविलाल पवार, रुचलेसिंग पवार व मिश्रीलाल चव्हाण या तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली. उपरोक्त तिन्ही आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी विशाल राजे यांच्या न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी रोख पन्नास हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे पुन्हा सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विदर्भात गतवर्षी उघडकीस आलेल्या वाघशिकार प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ढाकणा परिक्षेत्रातील वाघिणीच्या शिकार प्रकरणात तीन वेगवेगळे प्रकरण दाखल आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणाचा निकाल बुधवारी सकाळी पहिल्या सत्रात लागला.
नियंत्रण शाखा स्थापित
ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकार प्रकरण उघडकीस आल्यावर मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सायबर सेलची स्थापना करण्यात आली. त्यानंतरच वाघ बचाव मोहिमेला विदर्भात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. वाघशिकार प्रकरणाचा स्वतंत्र तपास करुन शिकाऱ्यांच्या अटकेसाठी व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी ते कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले.
दिल्ली, उत्तरांचल, आंध्रप्रदेश, ओरीसा, मध्यप्रदेश, तामिळनाडू या राज्यासह महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये धाडी टाकून आरोपींना ताब्यात घेतले. प्रत्येकवेळी नवीन माहिती पुढे येत असल्याने विदेशापर्यंत पोहचलेले तस्करीचे संबंध व वाघाच्या कातड्याची होणारी तस्करी उघडकीस आली.
असे आहे प्रकरण
-मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित ढाकणा परिक्षेत्रातील दक्षिण डोलार वनखंड क्रमांक ९०५ मध्ये ४ मार्च २०१३ रोजी एका वाघिणीची शिकार झाल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावर वन्यजीव विभागाने चौकशीला सुरुवात करताच सिनबन येथील उपरोक्त सात शिकाऱ्यांना अटक केली होती. घटनास्थळासह आरोपींनी वाघिणीच्या शिकारीची बरीच थक्क करणारी माहिती दिली होती. त्यावर व्याघ्र अधिकाऱ्यांनी देशभर धाडी टाकून जवळपास ४० शिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. ढाकणा प्रकरणातील शिकाऱ्यांच्या ताब्यातून रोख ३३ हजार ९०० रुपयांसह वाघिणीच्या रक्ताने माखलेले दगड, माती, वाघिणीचे मांस व शिकारीसाठी वापरलेले लोखंडी सापडा, सुरे, चाकू आदी साहित्य जप्त केले. त्यानंतर हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर बहुप्रतीक्षित वाघ शिकार प्रकरणाचा निकाल आज बुधवारी लागला. सरकारतर्फे अधिवक्ता उदय देशमुख यांनी बाजू मांडली.
विदर्भातील पहिला निकाल
-ढाकणा परिक्षेत्रातील वाघिणीच्या शिकारीचा निकाल मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सायबर सेलसाठी पहिला ठरला आहे. याप्रकरणात माफीचा साक्षीदार असलेला अनिस राठोड याने न्यायालयात बयाण बदलविल्यामुळे प्रकरणातील आरोपी निर्दोष तर सुटणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती.