लाचखोरीची सव्वाशे कारणे होणार हद्दपार!
By Admin | Updated: October 2, 2015 04:17 IST2015-10-02T04:17:30+5:302015-10-02T04:17:30+5:30
सामान्य माणसाला सरकार दरबारी अनेकदा अनेक ठिकाणी द्याव्या लागणाऱ्या लाचेपासून कायमची मुक्तता मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचमुक्ती अभियान हाती घेतले आहे.

लाचखोरीची सव्वाशे कारणे होणार हद्दपार!
यदु जोशी , मुंबई
सामान्य माणसाला सरकार दरबारी अनेकदा अनेक ठिकाणी द्याव्या लागणाऱ्या लाचेपासून कायमची मुक्तता मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचमुक्ती अभियान हाती घेतले आहे. ज्या कारणांसाठी वारंवार लाच द्यावी लागते अशी सव्वाशे कारणे त्यांनी शोधली असून, लाच देण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींनाच पायबंद घालण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे.
सरकारी कार्यालयांमध्ये चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही, हा सार्वत्रिक अनुभव अनेकांच्या वाट्याला येतो. त्यातून ‘टेबलाखालून काही तरी द्यावेच लागते’ अशी समाजाची मानसिकता बनली आहे. सरकारी कार्यालयांच्या बाबतीत असलेली ही मानसिकता बदलण्यासाठी कामकाजाची नवी पद्धत विकसित केली जात आहे.
लाच देण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींनाच पायबंद घालण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक गोष्टी आॅनलाइन करणे, त्यातील कालापव्यय संपविणे, नियम काटेकोर करून पळवाटा बंद करणे, मानवी हस्तक्षेप संपविणे, अडवणूक करणाऱ्या घटकांना पायबंद घालणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबत संबंधित सचिवांना पत्र पाठवून मुख्यमंत्री मते मागविणार असून त्यानंतर रुपरेषा निश्चित करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यत्वे, गृह, महसूल, नगरविकास, शिक्षण या खात्यांबाबत लाचखोरीचे अधिकाधिक प्रकार घडतात,असा अनुभव आहे. मुख्यमंत्र्यांनीही मुख्यत्वे याच खात्यांमधून लाचखोरी हद्दपार करण्यावर भर दिला आहे.
1 नवीन नळ कनेक्शन घेणे, घरपट्टी जास्त न आकारण्यासाठी, बिगर शेती परवान्यासाठी, बांधकाम न पाडण्यासाठी
2रेती वाहतूक, माती वाहतुकीची परवानगी, वीटभट्टी सुरू करण्याचा परवाना, रेशन दुकानावर कारवाई न टाळण्यासाठी, जमीन-घराचे खरेदीखत व इतर दस्त
3विम्याची रक्कम मृताच्या वारसाच्या नावावर जमा करण्यासाठी, शिवारात लावलेल्या झाडांची नोंद घेण्यासाठी, विविध प्रकारच्या अनुदानांचा लाभ, हॉटेल खाद्य परवाना 4समन्सची माहिती देण्यासाठी, खोटा गुन्हा दाखल करून त्यामध्ये अटक करण्याची बतावणी करणे, गुन्ह्याच्या तपासात पैसे उकळणे, दाखल गुन्ह्याचे प्रकरण मिटविण्यासाठी, लोकल ट्रेनमध्ये फेरीवाल्याचा धंदा करू देण्यासाठी
5पदोन्नतीचे प्रस्ताव शिफारस करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, घरकुलांचे बिल काढणे, मनरेगाची मोजमाप पुस्तिका नोंद, मोकळ्या जमिनीची नोंद ग्रामपंचायत अभिलेखावर करणे, अंगणवाडी बांधकामाची चौकशी, नवीन घरांसाठी घरपट्टी सुरू करून एनओसी देणे, आंतरजातीय विवाहितांना शासकीय मदतीचा चेक देणे, कार्यालयीन बिले मंजूर करणे आणि मंजूर बिले अदा करणे, अतिक्रमणाला अभय, मूळ घरावर अधिकचे बांधकाम करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्या देणे, शाळांमध्ये नवीन इयत्ता सुरू करण्याची परवानगी, शाळा सोडल्याचा दाखला देणे.