यवतमाळ : सार्वजनिक नळ योजनेच्या विहिरीतील गाळ काढताना गुदमरून पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना राळेगाव तालुक्यातील कारेगाव येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. गाळ उपसण्यासाठी विहिरीत सोडलेल्या इंजीनचा धूरच या पाच जणांसाठी काळ ठरला. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथे हलविण्यात आले.मृतांमध्ये विजय पुरुषोत्तम नंदूरकर (४५), भूपेश कवडू कुडमते (३०), आशिष तुकाराम मडावी (३५), शंकर रमेश जोगी (३२), गणेश राजू नंदूरकर (२५) यांचा समावेश आहे. काही दिवसांपासून कारेगाव या गावाची पाणीपातळी खालावली आहे़ परिणामी गावाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या़ या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने विहिरीतील गाळ उपसण्याचा निर्णय घेतला. यानुसार मंगळवारी सकाळी १० वाजेपासूनच कामाला सुरुवात झाली. केवळ एकच व्यक्ती आत उतरू शकेल, एवढी जागा विहिरीवर आहे. उर्वरित पूर्ण भागावर स्लॅब आहे. छोट्या जागेतून विहिरीतील पाणी उपसण्यासाठी डिझेल इंजीन सोडण्यात आले. यानंतर अन्य सहा मजूर विहिरीत उतरले. इंजीन सुरू करताच धूर झाला. धूर बाहेर पडण्यासाठी मोठी जागा नसल्याने विहिरीतच कोंडला गेला. याचे प्रमाण वाढताच मजुरांचा श्वास गुदमरला. त्यातच पाच जणांचा मृत्यू झाला. रामू देवराव बावने आणि प्रफुल्ल वामन हिवरकर या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम येथे हलविण्यात आले. (प्रतिनिधी)
विहिरीत गुदमरून पाच मजुरांचा मृत्यू
By admin | Updated: April 1, 2015 02:09 IST