पाच दोषींना फाशी, सात आजन्म तुरुंगात
By Admin | Updated: October 1, 2015 03:38 IST2015-10-01T03:38:58+5:302015-10-01T03:38:58+5:30
मुंबईत पश्चिम रेल्वेच्या सात लोकल गाड्यांमध्ये नऊ वर्षांपूर्वी, ११ जुलै रोजी भीषण बॉम्बस्फोट करून १८९ निरपराधांचा बळी घेतल्याबद्दल

पाच दोषींना फाशी, सात आजन्म तुरुंगात
मुंबई : मुंबईत पश्चिम रेल्वेच्या सात लोकल गाड्यांमध्ये नऊ वर्षांपूर्वी, ११ जुलै रोजी भीषण बॉम्बस्फोट करून १८९ निरपराधांचा बळी घेतल्याबद्दल दोषी ठरलेल्या पाच दहशतवाद्यांना फाशी तर उर्वरित सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष मोक्का न्यायालयाने बुधवारी हा निकाल जाहीर केला. याशिवाय न्यायालयाने दोषी ठरलेल्या आरोपींना मिळून एकूण एक कोटी ५७ लाख ८० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. या निकालामुळे नऊ वर्षांनंतर न्याय मिळाल्याची भावना मृतांच्या नातेवाइकांमध्ये व्यक्त होत होती.
या खटल्यातील १३ आरोपींपैकी १२ आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यतीन डी. शिंदे यांनी ११ सप्टेंबर रोजी दोषी ठरवले, तर एकाची सुटका केली होती. त्यानंतर काही दिवस शिक्षेबाबत सुनावणी झाली. अखेर बुधवार निकालाचा दिवस ठरला. सकाळी ११:३० वाजता कडेकोट बंदोबस्तात १२ आरोपींना कोर्ट रूममध्ये हजर करण्यात आले. दुपारी १२ वाजता न्यायाधीश शिंदे यांनी निकाल देण्यास सुरुवात केली. अवघ्या सात मिनिटांत त्यांनी पाच जणांना फाशीची शिक्षा, तर सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याचा निकाल जाहीर केला.
शिक्षा सुनावल्यानंतरही सर्व दोषी शांतच होते. मात्र त्यांच्या नातेवाइकांनी आणि वकिलांनी हे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ आणि तेथे आरोपी निर्दोष असल्याचे सिद्ध होतील, अशी आशाही दोषींच्या नातेवाइकांनी आणि वकिलांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
---------
बॉम्बस्फोटांना भारतीय रंग देण्यात ‘लष्कर’ अपयशी
या बॉम्बस्फोटांचा कट प्रत्यक्षात पाकमध्ये शिजला असला तरी हे स्फोट भारतीय दहशतवाद्यांनीच केले, असा बनाव करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तींना भारतातच प्रशिक्षण देण्याची ‘लष्कर-ए-तोयबा’ची योजना होती. याची तयारी २००३ पासूनच सुरू झाली होती. परंतु ‘लष्कर’चा हा डाव फसला, असे तपासातून उघड झाले.
------
कमल अन्सारी (३७), एहतेशाम सिद्दिकी (३०), मोहम्मद फैजल शेख (३६), नावीद हुसेन खान (३०), आसिफ बशीर खान (३८) यांना भारतीय दंडसंहिता ३०२ (हत्या), १२० (ब) (कटकारस्थान) आणि मोक्कातील कलम ३ अंतर्गत फाशीची शिक्षा ठोठावली. मरेपर्यंत त्यांना फाशी ठोठावण्यात यावी, असे न्या. शिंदे यांनी शिक्षा सुनावताना म्हटले.
----------
मदत करणारे जन्मभर गजाआड
मोहम्मद शफी (३२), सोहेल मोहम्मद शेख (४३) , मुजम्मिल शेख (२७), तन्वीर अन्सारी (३७), जमीर अहमद शेख (३६), मोहम्मद अली (४१) आणि साजिद अहमद अन्सारी (३६) यांनी मोक्का, बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि आयपीसी कलम १२१ (देशाविरुद्ध युद्ध छेडणे) अंतर्गत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
---------
या निर्णयावर मी समाधानी आहे. माझी जबाबदारी मी पार पाडली. सात जणांच्या जन्मठेपेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करायचा की नाही, हे न्यायाधीशांनी केलेल्या कारणीमीमांसेवरूनच ठरवले जाईल. त्यासाठी निकालपत्राची वाट बघावी लागेल.
-राजा ठाकरे, विशेष सरकारी वकील