पाच देहांचा कोळसा करू कुणाच्या हवाली?
By Admin | Updated: May 24, 2014 01:11 IST2014-05-24T01:11:15+5:302014-05-24T01:11:15+5:30
सुन्न पडलेल्या निशांत प्रकाश सिरियाच्या आक्रोशातील हा भाव सार्यांचाच थरकाप उडविणारा आहे. गुरुवारी मध्यरात्री त्याने आई, पत्नी, मुलगा, बहीण आणि भाची असा अवघा परिवारच गमावला, तोही अत्यंत भयावहरीत्या!

पाच देहांचा कोळसा करू कुणाच्या हवाली?
आक्रोशातील भाव : सार्यांचाच थरकाप उडविणारा
नरेश डोंगरे - नागपूर
सुन्न पडलेल्या निशांत प्रकाश सिरियाच्या आक्रोशातील हा भाव सार्यांचाच थरकाप उडविणारा आहे. गुरुवारी मध्यरात्री त्याने आई, पत्नी, मुलगा, बहीण आणि भाची असा अवघा परिवारच गमावला, तोही अत्यंत भयावहरीत्या! गोकुळपेठेतील अजिंक्य प्लाझा या चार माळ्यांच्या इमारतीत राहणारा निशांत (वय ३१) संगणकाचे काम करतो. त्याची आई सलीला (वय ६०) भारतीय विद्या भवनमधून वर्षभरापूर्वी निवृत्त झाल्या होत्या. मनमिळावू आई, समंजस पत्नी रागिणी (वय ३१) घरात सर्वांचाच जीव की प्राण असलेला चिमुकला निरांश (वय अडीच वर्षे) असा मोजका आणि नजर लागण्यासारखा परिवार. बहीण श्रुती श्रीकांत माळी (वय २५) प्रतापनगरात राहायची. तिला दोन वर्षांची मुलगी (सहना) होती. श्रुतीचे पती श्रीकांत एमआर आहेत. पती दौर्यावर गेले की श्रुती चिमुकलीला घेऊन माहेरी यायची. आई, पत्नी, बहीण, गोड मुलगा अन् तेवढीच गोंडस भाची घरात असले की गोकुळच भरल्यासारखे वाटायचे. श्रीकांत बाहेर गेल्यामुळे श्रुती नेहमीप्रमाणे आपल्या चिमुकलीला घेऊन माहेरी आली होती. गुरुवारी रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर टीव्हीवरील सिरियल अन् निरांश तसेच सहनाचे लाडकोड करीत हे कुटुंब झोपले. ते बेसावध झाल्याची काळाला खात्री पटली असावी. म्हणूनच की काय त्याने आपला डाव फेकला. चौकीदार लेखराज रतिराम परते जोरजोरात ओरडू लागला. ‘निचे आग लगी... निचे आग लगी...’ मध्यरात्री सुमारे दीड वाजता ही आरडाओरड ऐकून निशांत, सलीला, रागिणी आणि श्रुती जागे झाले. अर्धवट झोपेतील या सर्वांना काय करावे त्याचेही भान नव्हते. खाली आग लागली हे कळल्यानंतर खाली कशाला जायचे, असा साधा प्रश्नही त्यांना पडला नाही. त्यात ते सर्व पहिल्याच माळ्यावर होते. मात्र, मृत्यूने जाळे टाकले होते. त्यात त्यांना अडकायचे होते. ते सर्व अलगद अडकलेच. वृध्द सलीला तसेच रागिणी आणि श्रुती आपापल्या चिमुकल्यांना खांद्यावर घेत सरळ लिफ्टमध्ये शिरल्या. लिफ्ट खाली आली. स्वयंचलित दार उघडले गेले अन् तिघींच्याही किंकाळ्यांनी ‘अजिंक्य प्लाझा’चा परिसर हादरला. येथे ओशाळला मृत्यू रागिणी आणि श्रुतीच्या खांद्यावर निद्रिस्त अवस्थेतील त्यांची चिमुकली होती. त्यांना काही कळायचा प्रश्नच नव्हता. आगीच्या वणव्यात सापडलेल्या सलीला, रागिणी आणि श्रुती जीवाच्या आकांताने ओरडत होत्या. निरागस निरांश आणि सहना ओरडले की नाही, ते काळालाच कळले असेल. तिकडे आग लागल्यामुळे आपल्यासोबत राहणार्यांना काही होऊ नये म्हणून निशांत प्रत्येकाचे दार ठोठावून त्यांना माहिती देऊ लागला. त्यांना काही होऊ नये, यासाठी त्याची ही धडपड होती. आई, पत्नी, बहीण, मुलगा, भाची सर्व खाली गेले, याचे भान येताच तो भरभर पायर्या उतरून खाली आला. काळाचे भयावह रूप, त्याने गिळंकृत केलेला त्याचा परिवार अन् ते एकूणच दृश्य हतबल निशांतला अंतर्बाह्य कोलमडून टाकणारे ठरले. तो काहीच करू शकत नव्हता. केवळ अन् केवळ ओरडत होता. तेव्हापासूनचे त्याचे आक्रंदन आताही सुरूच आहे. या घटनेची माहिती कळाल्यानंतर श्रीकांतची झालेली अवस्थाही याहून वेगळी नाही.