मासेमारी बोट खडकावर आदळली मच्छीमार सुखरूप : पाचू बंदर किनार्यावरील घटना
By Admin | Updated: May 17, 2014 22:01 IST2014-05-17T18:36:11+5:302014-05-17T22:01:04+5:30
रात्री किनार्यावर परतत असताना नायगाव येथील मासेमारी बोट खडकावर आदळून अपघात झाला. यात बोटीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

मासेमारी बोट खडकावर आदळली मच्छीमार सुखरूप : पाचू बंदर किनार्यावरील घटना
नायगाव : मासेमारी करून शुक्रवारी रात्री किनार्यावर परतत असताना नायगाव येथील मासेमारी बोट खडकावर आदळून अपघात झाला. यात बोटीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
ही परतणारी बोट सेंट पिटर (कॅरोस) जेम्स मानकर यांच्या मालकीची आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वसईतील पाचू बंदर किनार्यावर येताना उत्तनपासून थोड्या अंतरावर ती खडकावर आदळली. या वेळी १० खलाशी या बोटीवर होते. धडक बसल्यानंतर समुद्रातील लाटांचा तडाखा बसून अल्पावधीतच या बोटीला जलसमाधी मिळाली. यात ३ लाखांची मासळी, वायरलेस मशिन, जाळी, डिझेल, बर्फ, इंजिन, आइस कटर्स मशिन्स हे वाहून गेले. अपघातानंतर सर्व खलाशी पाण्यात उड्या मारू लागले. या वेळी अक्षय तरे (२२) या तरुणाने प्रसंगावधान राखत स्वत:च्या मोबाइलवरून घरी संपर्क साधून हकिकत कळवली. रात्रीच्या अंधारात केवळ त्याच मोबाइलच्या फ्लॅश लाइटवर या मच्छीमारांनी दीड तास पोहून उत्तन चौक बंदर गाठले. एकूण २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शनिवारी सकाळी ख्रिस्तार्पण व शृंगार या बोटींच्या साहाय्याने अपघातग्रस्त बोट दुपारी १ वाजता किल्लाबंदर किनार्यावर आणण्यात आली. यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. या बोटीची ही शेवटची फेरी होती. मात्र या अपघातानंतर सदर बोट दुरुस्त होणे अशक्य आहे. शासनाकडून साहाय्य मिळणे आवश्यक असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.