औरंगाबादला होणार पहिले युवा संमेलन
By Admin | Updated: November 1, 2015 00:54 IST2015-11-01T00:54:32+5:302015-11-01T00:54:32+5:30
युवा साहित्यिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण पिढीतील साहित्यिक अभिरुची टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पहिले अखिल भारतीय युवा साहित्य संमेलन औरंगाबदमध्ये

औरंगाबादला होणार पहिले युवा संमेलन
पुणे : युवा साहित्यिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण पिढीतील साहित्यिक अभिरुची टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने पहिले अखिल भारतीय युवा साहित्य संमेलन औरंगाबदमध्ये होणार आहे. ही माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१२मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण आखण्यात आले. या धोरणातील योजना क्र. ८ अंतर्गत युवा साहित्य संमेलन ही बाब अंतर्भूत करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर प्रतिवर्षी १८ ते ३५ वयोगटातील युवकांसाठी युवा साहित्य संमेलन आयोजित करावे, यासाठीच राज्य शासनाने अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे या पहिल्या युवा साहित्य संमेलनाची जबाबदारी मराठवाडा साहित्य परिषदेने उचलली आहे. हे संमेलन फेब्रुवारी २०१६मध्ये होण्याची शक्यता
आहे.
त्यासाठी एकूण १० मान्यवर सदस्यांची मार्गदर्शक समिती नेमण्यात येणार आहे. या मार्गदर्शक समितीमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेचे ४ पदाधिकारी, साहित्य महामंडळाचे ३ पदाधिकारी तसेच मुंबई साहित्य संघाच्या उषा कांबळे, विदर्भ साहित्य संघाचे मनोहर म्हैसाळकर, अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे आदी मान्यवरांचा समावेश असेल.