सिंचन घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: August 22, 2015 00:49 IST2015-08-22T00:49:40+5:302015-08-22T00:49:40+5:30
कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यांपैकी दोन मोठ्या प्रकल्पांतील गैरव्यवहाराची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी)

सिंचन घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्प्यात
नागपूर : कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यांपैकी दोन मोठ्या प्रकल्पांतील गैरव्यवहाराची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधीक्षक राजीव जैन यांनी गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही माहिती दिली.
सिंचन घोटाळ्याची चौकशी सरकारने एसीबीकडे सोपविली आहे. त्यातील काही प्रकल्पांची चौकशी एसीबीच्या नागपूर विभागाकडून केली जात आहे. संबंधित तज्ज्ञांच्या मदतीने सलग दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत करण्यात आलेली ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे. त्यासंबंधीचा अहवाल तयार झाल्यानंतर तो एसीबीच्या महासंचालकांकडे सादर केला जाईल, असे जैन यांनी सांगितले.
चौकशीदरम्यानच्या बाबी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आलेल्या अडचणींवर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यापूर्वी काही बोलणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी फाईल्स देण्यासाठी बरीच टाळाटाळ केल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठांकडून पाठपुरावा झाल्यानंतर या फाईल्स मिळाल्या. या गैरव्यवहाराचे कोण कोण लाभार्थी आहेत, त्याची चौकशी सुरू असल्याचे जैन म्हणाले. निविदा प्रक्रिया संशयास्पद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.