‘हार्टलेस’ बसेसने भरविली धडकी
By Admin | Updated: September 22, 2014 00:50 IST2014-09-22T00:50:29+5:302014-09-22T00:50:29+5:30
रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे.

‘हार्टलेस’ बसेसने भरविली धडकी
मार्गात ब्रेकडाऊन : कार्यशाळा अधिकाऱ्यांचीही चालढकल
यवतमाळ : रेडिएटर हे मोठ्या वाहनांचे हृदय मानले जाते. ते नसेल तर वाहन गरम होऊन कुठे बंद पडेल याचा नेम नसतो. ही बाब एसटी महामंडळातील कार्यशाळा विभागात कार्यरत अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. मात्र केवळ चालढकल सुरू असल्याने रेडिएटर नसलेल्या एसटी बसेस मार्गावर धावत आहेत. परिणामी प्रवाशांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.
ब्रेकडाऊन ही बाब एसटी महामंडळाच्या पाचवीला पुजली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेली बस वेळ, काळ, स्थळ न पाहता बंद पडते. अशावेळी त्यांच्या जीवाला धोका असतो. मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागतो. आडवळणाच्या गावात बंद पडलेली बस जीवाला घोर लावणारी ठरते. या सर्व बाबींची कल्पना असतानाही सुस्थितीतील बस मार्गावर पाठविण्याचे सौजन्य महामंडळाकडून दाखविले जात नाही. आता तर त्यात कळस गाठला आहे. चक्क रेडिएटर नसलेल्या बसेस सोडल्या जात आहेत.
शनिवारी ८६५३ क्रमांकाची यवतमाळ-घाटंजी ही बस याच प्रकारातील आहे. यवतमाळपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढरी गावाजवळ ही बस थांबली. या बसला रेडिएटरच नव्हते. गरम झाल्यामुळे थांबलेल्या बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. आगारातून बस सोडताना ती रस्त्यावर धावण्यापूर्वी सुस्थितीत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी कार्यशाळा अधीक्षक आणि या विभागांतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. परंतु या बाबीशी आपल्याला काहीही देणे-घेणे नाही, या तोऱ्यात ते वागत असतात.
त्यामुळे महामंडळाची जागोजागी नाचक्की होत आहे. परिणामी उत्पन्नावरही फरक पडत आहे. (वार्ताहर)
पासिंग संपलेल्या बसेस रस्त्यावर
वाहन कोणतेही असो, त्यासाठी आरटीओचे नियम आहे. हेच नियम एसटी महामंडळालाही लागू आहेत. मात्र महामंडळाच्या काही बसेस पासिंग संपल्यानंतरही रस्त्यावर धावत आहे. केवळ शासनाचा उपक्रम म्हणून नियमातून सवलत मिळत असल्याने महामंडळही गंभीर नाही. ५०२४ या क्रमांकाची बस पासिंग झालेले नसतानाही नांदेडसाठी सोडण्यात आली. वास्तविक बस पासिंगसाठी महिनाभरापूर्वीच नियोजन केले जाते. सदर क्रमांकाच्या बसचे शनिवारी पासिंग होणार होते. ही बाब काही वेळानंतर लक्षात आली. मात्र त्यावेळी बस बऱ्याच दूरपर्यंत पोहोचली होती. पासिंग नसलेल्या बसला अपघात झाल्यास प्रवाशांना कुठलाही लाभ मिळत नाही. शिवाय चालकांवरही कारवाई केली जाते. मात्र या बाबीला जबाबदार अधिकारी कारवाई टाळली जाते.