शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय जागा घेऊ देणार नाही
By Admin | Updated: December 21, 2015 00:17 IST2015-12-21T00:17:40+5:302015-12-21T00:17:40+5:30
चाकण येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी एक इंचही जमीन शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय घेऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दिला

शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय जागा घेऊ देणार नाही
राजगुरुनगर : चाकण येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी एक इंचही जमीन शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय घेऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दिला.
चाकणजवळच्या ६ गावांच्या जमिनी घेण्याऐवजी सेझ प्रकल्पातील सेझबाधितांच्या परताव्याच्या जमिनी आणि सेझच्या अविकसित जमिनी एमआयडीसीसाठी आजच्या दराने घ्याव्यात, अशी मागणी ही शेट्टी यांनी केली. खेड तालुका आधीच प्रकल्पग्रस्त तालुका झाला आहे. जवळपास ८ हजार एकर जमिनी संपादित झाल्या आहेत. पाचव्या टप्प्यासाठी सध्याच्या प्रस्तावित जमिनी बागायती आहेत. विमानतळाकरिता प्रस्तावित आणि भामा आसखेड धरणाच्या कालव्यांसाठी व लाभक्षेत्रासाठी राखून ठेवलेल्या म्हणून ज्या जमिनीवर १३ वर्षांपासून शिक्के मारून ठेवले आणि शेतकऱ्यांना विकासापासून वंचित ठेवले; त्याच जमिनी आता एमआयडीसीकरिता घेण्यास निघाले आहेत. त्यासाठी खेड तालुक्यात मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला. (वार्ताहर)