अमरावती (शिराळा) : सततच्या नापिकीला कंटाळून शिराळा येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बापू जानराव लादे (४२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.मंगळवारी सकाळी ८.३० वाजता ही घटना उघडकीस आली. शिराळा येथील रहिवासी असलेले बापू लादे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीयकृत बँकेतून ७० हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र, अनियमित पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सततच्या नापिकीमुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. कर्जवसुलीसाठी बँकेच्या तगाद्यामुळे ते हैराण झाले होते. याच मानसिक दडपणातून त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांना घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (वार्ताहर)
नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: October 7, 2014 05:34 IST